मुंबई – कोकणचा समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कोकणची भाग्यरेषा ठरलेल्या मुंबई- गोवा महामार्गावरील सर्वात मोठा कशेडी बोगदा आता येत्या मे महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे.येथील दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून हा बोगदा आता मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान,याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या दुसर्या बोगद्याचे कामही ८० टक्के पूर्ण झाले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून या बोगद्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.नोव्हेंबर २०१८ मध्ये या बोगद्याच्या कामाला सुरवात झाली.या प्रकल्पासाठी ४४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कशेडी बोगदा तीन पदरी असून असे दोन बोगदे हाती घेण्यात आले आहेत. त्यातील मुंबईच्या बाजूने जाणाऱ्या एका बोगद्याचे काम ८० टक्के झाले आहे. मे महिन्याअखेरीस म्हणजेच येत्या दोन महिन्यात या बोगद्यातून वाहतूक सुरु होणार असल्याचे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कशेडी ते रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भोगाव इथपर्यंत कशेडी बोगदा हा दोन किलोमीटरचा असून एक तासाचे अंतर अवघ्या १० मिनिटात पार होणार आहे.