सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा
पत्रकाराला मारहाण केल्याची तक्रार रद्द

मुंबई
पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान आणि त्यांच्या अंगरक्षक नवाज शेखविरोधात अंधेरी कोर्टात दाखल केलेली तक्रार मुंबई हायकोर्टाने आज रद्द केली. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे सलमान खानला दिलासा मिळाला.
2019 साली सलमान सायकल चालवत असताना त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेखने शिवीगाळ आणि मारहाण केली, असा आरोप करून स्थानिक पत्रकार अशोक पांडेने अंधेरी न्यायालयात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाला समन्स बजावून 5 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर सलमानने मुंबई हायकोर्टात दोन याचिका दाखल केल्या. या दोन्ही याचिकांवर स्वतंत्र सुनावणी झाली आणि पोलिसांत तक्रार नोंदवताना सलमानने माझा फोन हिसकावल्याचे, तर दंडाधिकाऱ्यांसमोरील तक्रारीत मात्र मारहाण केल्याचे पांडे यांनी म्हटले होते. दोन महिन्यांनी तक्रार करण्याच्या पांडेंच्या भूमिकेवरही हायकार्टाने प्रश्न उपस्थित केला होता आणि आज या दोन्ही याचिका स्वीकारत हायकोर्टाकडून अंधेरी कोर्टातील याचिका आणि सलमानला बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्यात आले आहे. यामुळे सलमान खान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Scroll to Top