अमरावती – अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. २० किंवा २१ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले. या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे मला सुद्धा मंत्रिपद मिळणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
‘एकनाथ शिंदे यांना बहुमत होते. त्यांनी कागदोपत्री यशस्वी लढा जिंकला. व्यवस्थित नियोजन केले. त्यांना सगळ्यांचे पाठबळ आहे,’ अशी प्रतिक्रिया कडू यांनी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालबाबत दिली. ते पुढे म्हणाले, ‘आता मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण नसावी. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. लोकांची कामे निकाली निघावीत यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. माझ्या कानावर आले आहे की, २० किंवा २१ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि ते गरजेचेही आहे. एकेका मंत्र्याला पाच ते सहा पालकमंत्रिपद आणि खाती दिल्याने लोकांची म्हणावी तशी कामे होत नाहीत. कोणाला मंत्री बनवतात हा नंतरचा भाग पण विस्तार होणे महत्त्वाचे आहे. आता विस्तार झाला नाही तर मग २०२४ नंतरच विस्तार होईल असे मला वाटते.’