मुंबई – राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघत असताना कल्याण डोंबिवली शहरातसुद्धा सेना भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी आहेत, असा आरोप करत शिंदे यांच्याविरोधात डोंबिवली शहरात बॅनरबाजी केली होती. त्यानंतर आज सेनेनं सुद्धा बॅनरबाजी करत भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांना टार्गेट केलंय. त्यामुळे शहरात निवडणुकीच्या तोंडावर बॅनरवॉर तापलेले दिसत आहे.
शिवसेनेने बॅनरमध्ये आम्ही करून दाखवले तुम्ही गाजर दाखवले, तीन वेळा आमदार, तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी, डोंबिवलीसाठी काय केले ते सांगा, तीन कामे तरी दाखवा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी गाजराचा फोटो देखील लावण्यात आला आहे. मात्र, अवघ्या काही तासाभरातच हे बॅनर केडीएमसीने पोलिसांच्या मदतीने काढले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. पालक मंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी केला होता. यानंतर डोंबिवलीत या आशयाचे बॅनर देखील भाजपकडून लावण्यात आले होते. याला आता सेनेनं बॅनर लावून प्रत्युत्तर दिले आहे.