नवी दिल्ली -आयकर भरणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सरकारने कोणताही दिलासा दिला नसून येत्या वर्षात गेल्या वर्षीप्रमाणेच कर रचना लागू राहणार आहे. आयकर स्लॅबसंदर्भात कोणताही बदल होणार नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केले आहे. सलग सहाव्या वर्षी कररचनेत बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, आयकर भरणाऱ्या करदात्यांना एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांतील चुका सुधारण्यासाठी त्यांना मुभा देण्यात येणार आहे.
आयकर रिटर्न भरताना काही चूक झाल्यास करदात्याची चौकशी केली जायची. मात्र यावर्षीपासून करदात्यांवर पूर्ण विश्वास ठेवून करदात्यांना आपली चुक सुधारता येण्याची मुभा देण्यात येणार आहे. “या पुढे काही चुका झाल्या तर त्याची चौकशी होणार नाही. त्या चुकामध्ये सुधारणा करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे.” असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तर महत्त्वाचे म्हणजे करचुकवेगिरी केल्यास आयकर विभागाने छापा टाकल्यास सर्व मालमत्तेवर टाच आणण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच, केंद्र सरकारने सहकारी सोसायट्यांसाठी असणारा किमान पर्यायी कर (alternate minimum tax) टॅक्स हा 18.5 टक्क्यांवरून 15 टक्के इतका करण्यात आला आहे. तर कॉर्पोरेट सरचार्च कमी करण्यात येणार असून तो 12 टक्क्यांवरुन 7 टक्क्यांवर आणला जाणार आहे.
जीसएटी लागू झाल्यापासून सर्वाधिक करसंचलन झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. तसेच, यावर्षी 1 लाख 40 हजार 986 कोटी रुपयांचं संकलन झाल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, सेझ आणि कस्टमच्या नियमांत बदल होणार असून यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
कसा आहे टॅक्स स्लॅब
उत्पन्न | कर |
2.5 लाख | कोणताही कर नाही |
2.5 लाख ते 5 लाख | 5 टक्के कर |
5 लाख ते 7.5 लाख | 10 टक्के कर |
7.5 लाख ते 10 लाख | 15 टक्के कर |
१० लाख ते 12.5 लाख | 20 टक्के कर |
१२.5 लाख ते 15 लाख | 25 टक्के कर |
तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा एनपीएस यावर्षीपासून समान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.