मुरुड – मुंबईपासून १५० किलोमीटर अंतरावर मुरुड तालुक्यात विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य आहे. ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे अभयारण्य आगीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आत्ता आगीच्या जाळ रेषा काढण्याचे काम वनविभागाने हाती घेतले आहे.
जंजिरा संस्थान असल्याच्या काळात हे शिकार क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.आता या ठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण व वृक्षतोडीला प्रतिबंध आहे.याठिकाणी वणवे लागण्याची शक्यता असते. वन्यजीवांकडून कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळ रेषा काढण्याचे काम सुरु केले आहे.जाळ रेषा काढणे म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेले सुके गवत,
पालापाचोळा काढून जाळून टाकणे.एखाद्या वाटसरूने जळती सिगारेट अथवा माचिस काडी टाकल्यास सुके गवत पेट घेऊन ही आग जंगलात पसरते.त्यामुळे वनसंपदा नष्ट होऊन वन्य प्राण्यांनाही धोका पोहचू शकतो.त्यामुळे जळीत रेषा काढण्याचे काम फणसाड अभयारण्यात दरवर्षी केले जाते,अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी दिली.