रायपुर – नववर्षातील २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या अभिषेक सोहळ्यासाठी प्रभू रामचंद्रांची आजोळभूमी असलेल्या छत्तीसगडमधून ‘सुगंधी तांदूळ ‘ नुकताच अयोध्येला रवाना झाला आहे. काल शनिवारी एकूण ३०० मेट्रिक टन ‘सुगंधी तांदूळ’ ११ ट्रकमधून छत्तीसगडकडे पाठविण्यात आले.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साई यांनी रायपुरमधील व्हीआयपी रोडवरील श्री राम मंदिर येथील एका कार्यक्रमात या तांदळाची वाहतुक करणाऱ्या ११ ट्रकना भगवा झेंडा दाखविला.त्यानिमित्त छत्तीसगड प्रदेश राईस मिलर्स असोसिएशनच्या ‘सुगंधित तांदूळ अर्पण सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.अयोध्येतील अभिषेक समारंभात प्रसाद म्हणुन हा तांदूळ वापरला जाणार आहे.छत्तीसगड राज्याला ‘भाताची वाटी’ म्हणून ओळखले जाते.अशी आख्यायिका आहे की, १४ वर्षांच्या वनवासात प्रभू रामचंद्र हे छत्तीसगडमध्ये विविध ठिकाणी राहिले होते. राजधानी रायपुरपासून सुमारे २७ किमी अंतरावर असलेले चांदखुरी हे गाव प्रभू रामाची आई माता कौसल्या यांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते.या गावात माता कौसल्या यांचे मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार मागील कॉंग्रेस सरकारच्या काळात झाला आहे.