नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २ व ३ जानेवारी रोजी तमिळनाडू दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ते १९ हजार ८५० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये रेल्वे, रस्ते, वायु आणि तेल प्रकल्पांबरोबरच बंदर विकास प्रकल्पांचा समावेश आहे.
२ जानेवारी रोजी पंतप्रधान सकाळी साडेदहा वाजता तिरुचिरापल्लीला पोहोचणार असून तिथे ते भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तिरुचिरापल्ली इथे दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ते तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे लोकार्पण करतील. ११०० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या इमारतीची प्रवासी क्षमता ४४ लाख आहे.पंतप्रधान या ठिकाणी विविध प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. यामध्ये ४१.४ किलोमीटर लांबीच्या सालेम मॅग्नेसाईट जंक्शन ओमालूर दाम सेक्शनच्या तसेच मदुराई टुटीकोराईन या १६० किलोमिटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्याही दूहेरीकरणाचा समावेश आहे. या मुळे तमिळनाडूच्या प्रवासी आणि सामान वाहतूकीला फायदा होणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ५ महामार्ग प्रकल्पांचेही लोकार्पणही होणार आहे. या रस्ते प्रकल्पांमुळे त्रिची, श्रीरंगम,चिंदंबरम, रामेश्वरम, मदुराईसह अनेक भागांध्ये प्रवासी आणि मालवाहूत जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पांमध्ये कल्लकम्म अणू उर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या मार्गाचाही समावेश आहे. पंतप्रधानांच्या हस्ते कामाराजगर बंदराच्या कार्गो बर्थचे उद्घाटनही होणार आहे. या बंदराच्या विकासामुळे तमिळनाडूत येणाऱ्या काळात मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९००० कोटी रुपयांच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये ४८८ किलोमीटर लांबीच्या चेलपेट ते सयालकुडी आणि विजयवाडा ते धरमपुरी या ६९७ किलोमिटर लांबीच्या पाईपलाईनचाही समावेश आहे.
पंतप्रधान आपल्या या दौऱ्यात इंदिरा गांधी अणू संशोधन प्रकल्पातल्या शीघ्र गती इंधन पुनःप्रक्रिया संयत्राचे ही उद्घाटन करणार असून त्रिचरापल्ली इथल्या एनआयटी या तंत्रज्ञान संस्थेतल्या विद्यार्थ्यांसाठीच्या ५०० विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचेही उद्घाटन करणार आहेत. लक्ष्यद्विप च्या इंटरनेट सेवेत सुधारणा होण्यासाठी समुद्राखालच्या ऑप्टिकल फायबर प्रकल्पाचे उद्धघाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. कावरती इथल्या सौर उर्जा प्रकल्पाचेही उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा लक्षद्वीप मधला पहिला बॅटरी बॅकअप प्रकल्प आहे.