सेकमई
काँग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दूसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी मणिपूरच्या सेकमई इथे पोहोचली असून दिवसभर या यात्रेत अनेकांनी आपला सहभाग नोंदवला. इथल्या जनतेने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
राहूल गांधी यांनी रविवारी इंफाळच्या पश्चिमेपासून आपल्या यात्रेला सुरुवात केली. यावेळी बोलतांना राहूल गांधी यांनी मणिपूरच्या प्रश्नावरुन केंद्र सरकारवर जोरदार टिका केली. पंतप्रधानांना मणिपूरच्या जनतेचे अश्रु पुसायला वेळ मिळाला नाही ही लज्जास्पद गोष्ट आहे. आपली यात्रा समाजात द्वेष नाही तर प्रेम व सद्भभाव निर्माण करण्यासाठी सुरु केली असल्याचे ते म्हणाले. सोमवारी ही यात्रा सेकमई इथे पोहोचली. सकाळी यात्रेला सुरुवात झाल्यापासूनचं स्थानिक लोकांनी मोठ्या उत्साहात राहूल गांधी यांचे स्वागत केले. यावेळी मणिपूरच्या कलाकारांनी पारंपारिक नृत्य सादर केले. यात्रेत सहभागी असलेल्यांनी काँग्रेसच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. लोकसभा निवडणूकीच्या आधीच निघालेल्या या भारत जोडो न्याय यात्रेने काँग्रेस अधिक मजबूत होईल असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
भारत जोडो न्याय यात्रा आपल्या ६ हजार २०० किलोमिटरच्या प्रवासात १५ राज्यांमधून जाणार असून ती ८५ जिल्ह्यांमध्ये पोहोचणार आहे. यात्रेचा समारोप २० मार्चला मुंबईत होणार आहे.