कोल्हापूर
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन १४ आणि १५ एप्रिलला बंद राहणार आहे. अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत राहावी यासाठी पुरातत्त्व विभागाच्या वतीने मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. १४ आणि १५ एप्रिलला ही संवर्धन प्रक्रिया पार पडणार असून या काळात देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी पितळी उंबऱ्याच्या बाहेर कलश व उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार आहे. या प्रक्रियेवळी भाविकांनी देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी केले आहे. श्री अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने तातडीने संवर्धन करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष तज्ञांनी दिला आहे. मार्च महिन्यात पुरातत्व खात्याच्या दोन निवृत्त अधिकारी विलास मांगीराज व आर.एस.त्र्यंबके यांनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी केली. मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी, मूर्तीची संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत, भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली यांनी अहवाल दिला आहे.