२० वर्षे बंद बोअरवेलमधून उडाले ६० फुटांपर्यंत पाणी

नंदुरबार- तालुक्यातील संततधार पावसातच खोंडामळी गावात गुरुवारी एक चमत्कार घडला.एका शेतकर्‍यांच्या २० वर्षे बंद असलेल्या बोअरवेलमधून अचानकपणे तब्बल ६० फुटांपर्यंत आकाशात पाण्याचे फवारे उडाले. शेवटी बोअरवेलवर दगड ठेवून पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला.

खोंडामळी गावात राहणारे शेतकरी मधुकर सावंत यांनी आपल्या शेतात २० वर्षांपूर्वी एक बोअरवेल खोदली होती.मात्र ही बोअरवेल तेव्हापासुन बंद अवस्थेत होती.या बंद पडलेल्या बोअरवेलमधून मोठा आवाज ऐकू आला.त्यानंतर अचानक पाण्याचा मोठा फवारा आकाशात फेकला गेला. सुमारे अर्धा तास ६० फुटांपर्यंत आकाशात हा पाण्याचा फवारा उडत होता.त्यानंतर हळूहळू पाण्याचा दाब कमी झाला. तरीही बोअरवेलमधून पाणी येत असल्याने शेतकरी सावंत यांनी त्याठिकाणी मोठा दगड ठेवून पाण्याचा प्रवाह बंद केला.मात्र या चमत्कारिक घटनेची चर्चा सुरू आहे.