Donald Trump | ‘तर व्यापार बंद …’, शस्त्रसंधीसाठी ट्रम्प यांची धमकी? भारताने फेटाळला दावा

Donald Trump on India Pakistan Truce |

Donald Trump on India Pakistan Truce | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य आण्विक युद्ध थांबवण्याचे श्रेय आपल्या प्रशासनाला दिले आहे. दोन्ही देशांमध्ये “पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी” घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.  

ट्रम्प म्हणाले की, त्यांनी दोन्ही देशांना व्यापारात मदत करण्याची ऑफर दिली होती आणि जर त्यांनी तणाव कमी केला नाही, तर अमेरिकेशी कोणताही व्यापार होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते.

“माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी घडवून आणण्यास मदत केली, मला वाटते की ती कायमस्वरूपी आहे. अनेक आण्विक शस्त्रे असलेल्या दोन राष्ट्रांमधील धोकादायक संघर्ष संपवला,” असे ट्रम्प म्हणाले.

“मी त्यांना म्हणालो, आम्ही तुमच्या दोघांशी खूप व्यापार करणार आहोत, म्हणून हे थांबवा. जर तुम्ही थांबवले नाही, तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही,” असे ट्रम्प पुढे म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी होण्याचे प्रमुख कारण व्यापार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि भारतासोबत व्यापार वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले. “त्यांनी अनेक कारणांमुळे असे केले. पण व्यापार हे त्यापैकी एक मोठे कारण आहे. आम्ही पाकिस्तान आणि भारत या दोघांशीही खूप व्यापार करणार आहोत. आम्ही सध्या भारताशी वाटाघाटी करत आहोत. लवकरच पाकिस्तानशी वाटाघाटी करू,” असे ते म्हणाले.

मात्र, सरकारी सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स (JD Vance) तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ (Marco Rubio) यांच्यातील स्वतंत्र संभाषणांमध्ये कोणत्याही व्यापार चर्चेचा उल्लेख नव्हता. याबाबत इंडिया टूडने वृत्त दिले आहे.

ट्रम्प यांनी पुढे दावा केला की, अमेरिकेने संभाव्य आण्विक संघर्ष टाळला. “आम्ही आण्विक संघर्ष थांबवला. मला वाटते की ते एक वाईट आण्विक युद्ध झाले असते. लाखो लोक मारले गेले असते, त्यामुळे मला याचा खूप अभिमान आहे,” असे ते म्हणाले.

दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ट्रम्प म्हणाले, “मला तुम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो की भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व दृढ, शक्तिशाली होते. पण दोन्ही बाबतीत ते स्थिर होते. परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे ताकद, बुद्धी आणि धैर्य होते.” त्यांच्या या विधानापूर्वी त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा केली होती