डोंबिवली -कल्याण-डोंबिवली महापालिकेने (KDMC) डोंबिवलीतील ६५ वादग्रस्त इमारतींपैकी ५४ इमारतींना पुन्हा नोटीस बजावली आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांवर पुन्हा बेघर होण्याची टांगती तलवार आहे. आपले संसार उघड्यावर पडणार या भीतीने अनेक रहिवासी चिंतेत असल्याचे सांगण्यात येते.
इमारती लवकर रिकाम्या करा, अन्यथा पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाईल, असा इशारा केडीएमसीच्या नोटिशींमध्ये देण्यात आला आहे. याआधी १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या आधारावर पालिकेने ही कारवाई सुरू केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra fadnvis)विधानसभेत ‘या इमारतींतील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही,’ असे आश्वासन दिले होते. मात्र आता पुन्हा नोटिसा आल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल या इमारतीतील रहिवाशांनी शिवसेनेचे (UBT) जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर ठाम राहून आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी केली. त्यावर नागरिकांना दिलासा मिळाला नाही, तर आम्ही नागरिकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. ६५ इमारतींतील सर्व रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खंबीरपणे उभी आहे, असे आश्वासन म्हात्रे यांनी रहिवाशांना दिले.