धाराशिव – धाराशिवमध्ये (Dharashiv) शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) भूसंपादनासाठी सुरू असलेली जमिनीची मोजणी प्रक्रिया अखेर थांबवण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या (Raju Shetti ) उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला. शेतकरी आंदोलनाचा धसका घेत प्रशासनाने तातडीने ही प्रक्रिया स्थगित केल्याचे सांगण्यात येते.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्ह्यात मोजणी सुरू असलेल्या भागात शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सुमारे ४०० ते ५०० शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत राजू शेट्टी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार गैरहजर असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेट्टी यांनी यावेळी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर संताप व्यक्त करत म्हटले, “शेतकऱ्यांना कसाबपेक्षाही वाईट वागणूक दिली जात आहे. तो देशद्रोही असूनही त्याला वकील दिला, आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली, खायला बिर्याणी दिली, मात्र इथे शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूनही घेतले जात नाही.