नवी दिल्ली – देशात भाजपाचे सरकार आल्यापासून देशाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप बदलून देशाला हिंदू विचारसरणीचा (Hindu ideology) बनवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप वारंवार केला जातो. समान नागरी कायदा, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा ही त्याची काही उदाहरणे आहेत. भाजपाच्या याच विसारसरणीला दुजोरा देणारे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh)सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे (Dattatreya Hosabale)यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले. ते म्हणाले की, हे दोन्ही शब्द मूळ संविधानात नव्हते आणि आणीबाणीच्या काळात संसदेच्या संमतीशिवाय जोडले गेले होते. ते शब्द काढून टाकण्यावर विचार व्हायला हवा.
देशात आणीबाणी (Emergency)लागू झाली, त्याला २५ जून रोजी ५० वर्षं पूर्ण झाली. भाजपाने संविधान हत्या दिवस म्हणून पाळला. या निमित्ताने भाजपाने देशभर कार्यक्रम केले. या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील सहभागी झाला होता. दिल्लीतील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात या निमत्ताने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतून समाजवादी (socialist) आणि धर्मनिरपेक्ष (secular) हे शब्द काढून टाकण्याबद्दल विचार करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू केली. ती तब्बल २१ महिने राहिली. या काळात सरकारने लोकांचे नागरी स्वातंत्र्य हिरावून घेतले. विरोधी पक्षांचे नेते व प्रसारमाध्यमे यांच्यावर क्रूरपणे कारवाई केली. आणीबाणीच्या काळातच काँग्रेस सरकारने संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांची भर घातली. हे शब्द संविधानाच्या प्रस्ताविकेतून काढायचे पुन्हा प्रयत्न झाले नाहीत. चर्चा, वादविवाद झाले. परंतु शब्द तसेच राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या मूळ संविधानात हे शब्द नव्हते. हे शब्द घटनेच्या प्रस्ताविकेत तसेच ठेवायचे का, याबाबत ५० वर्षांनंतर आपण विचार करायला हवा. तसेच ५० वर्षांपूर्वी देशावर आणीबाणी लादल्याबद्दल काँग्रेसने जनतेची माफी मागायला हवी.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी होसबळे यांच्या वक्तव्यावरून भाजपावर टीका करत म्हटले की, भाजपा आणि त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.