JNU Clash at Vijayadashmi – दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) दसऱ्या दिवशी रावणदहन कार्यक्रमात माजी विद्यार्थी उमर खालिद आणि शरजील इमाम यांचे चेहरे लावल्याने मोठा वादंग झाला. विद्यापीठ परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता.
या गोंधळाबाबत जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी सांगितले की, रावण दहनाच्या दिवशी एक पोस्टर प्रसारित झाले. यामध्ये दिल्ली दंगल प्रकरणी २०२० पासून तुरुंगात असलेले विद्यापीठाचे माजी विद्यार्थी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना रावण म्हणून दाखवले होते. या विरोधात काही विद्यार्थी गटांनी निदर्शने केली.
दुसरीकडे अभाविपने आरोप केला की, डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टूडेंट्स असोसिएशन (एआयएसए), स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन (डीएसएफ) या संघटनांनी सायंकाळी सातच्या सुमारास दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर साबरमती टी-पॉइंट येथे हल्ला केला.
यावेळी विद्यार्थ्यांवर दगडफेक करून शिवीगाळ झाली. काही विद्यार्थी जखमी झाले. अभाविपचे जेएनयू अध्यक्ष मयंक पांचाल यांनी हा हल्ला केवळ धार्मिक कार्यक्रमावर नाही तर विद्यापीठातील उत्सव परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या श्रद्धेवर असल्याचा आरोप केला.
एआयएसएने मात्र हे आरोप फेटाळून लावत अभाविपवर रावणदहनाच्या माध्यमातून धर्माचा राजकीय वापर केल्याचा पलटवार केला. त्यांनी सांगितले की, उमर आणि शरजील यांचे चेहरे रावण म्हणून लावणे हा केवळ राजकीय फायद्यासाठी इस्लामोफोबिया पसरवण्याचा प्रयत्न आहे. नथूराम गोडसे, गुरमीत राम रहीम यांच्यासारख्या वादग्रस्त व्यक्तींना रावण का दाखवले जात नाही?
हे देखील वाचा –
मीराबाई चानूचे वर्ल्ड वेटलिफ्टिंगमध्ये दमदार पुनरागमन! 199KG वजन उचलत जिंकले रौप्य पदक
रक्ताने हात माखलेल्यांनी जातीवर बोलू नये! जरांगेंचा मुंडेंना इशारा!