CBI Accepts Sohrabuddin Verdict – गँगस्टर सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणातील सर्व २२ आरोपींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणार नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने विशेष न्यायालयाचा निकाल स्वीकारला असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले.
नोव्हेंबर २००५ मध्ये गुजरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत सोहराबुद्दीन शेख मारला गेला होता. त्यानंतर डिसेंबर महिन्यात त्याची पत्नी कौसर बी तर २००६ मध्ये सोहराबुद्दीनचा एक साथीदार तुलसीराम प्रजापतीदेखील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पोलीस चकमकींत मारले गेले. या तिन्ही चकमकी बनावट होत्या, असा आरोप होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चकमकींशी संबंधित खटला गुजरातऐवजी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात चालवण्यात आला. विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या खटल्यात एक आरोपी होते. मात्र खटल्यात आरोपनिश्चिती होण्याआधीच न्यायालयाने शहा यांच्यासह काही आरोपींना दोषमुक्त केले होते.
त्यानंतर २२ आरोपींवर खटला चालला. डिसेंबर २०१८ मध्ये खटल्याचा निकाल देताना विशेष सीबीआय न्यायालयाने सर्वच्या सर्व २२ आरोपींची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला सोहराबुद्दीनचे भाऊ रुबाबुद्दीन आणि नयाबुद्दीन शेख यांनी एप्रिल २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्याप्रसंगी आरोपींच्या निर्दोषत्वाला आव्हान देणार नसल्याचे सीबीआयने सांगितले.
हे देखील वाचा –
डोनाल्ड ट्रम्प यांना खरचं नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का?
शिवसेना पक्ष व चिन्ह! पुन्हा तारीख!शिंदे गटाचा वेळकाढूपणा सुरूच
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन!आता वाढवण बंदराकडे पंतप्रधानांचे लक्ष