Bihar promises 1 crore jobs – बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीने १ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. सतत २० वर्षे बिहारमध्ये सत्तेवर असल्यानंतर हेच आश्वासन दिले.
एनडीएने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करत आश्वासनांचा पाऊस पाडला. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.
संकल्प पत्र २०२५ नामक जाहीरनाम्यात रोजगार, महिला सशक्तीकरण, कृषी विकास यावर भर देण्यात आला आहे. बिहारला जागतिक कौशल्य केंद्र म्हणून नावारूपाला आणण्याचा मानस जाहीर करण्यात आला.
आज सकाळी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर नितीशकुमार आणि नड्डा हे काहीही न बोलताच निघून गेले. भाजपाचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीच जाहीरनाम्याबद्दल भाष्य केले. बिहार निवडणुकीत महिला आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
इंडिया आघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करत प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे, तर एनडीएनेही १ कोटी सरकारी नोकरी व रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. पण यामध्ये सरकारी नोकऱ्या किती आणि खासगी रोजगार किती याबद्दल गोंधळ आहे. एनडीएने निवडणुकीआधीच महिलांच्या खात्यावर १० हजार रुपयांचा पहिला हप्ता टाकला आहे.
एनडीएच्या जाहीरनाम्यात २५ प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत. यानुसार, राज्यातील महिलांना मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेंतून २ लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ, १ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प जाहीर केला.
गोरगरीबांना आकर्षित करण्यासाठी पंचामृत गॅरंटी योजना जाहीर केली आहे. यामध्ये मोफत रेशन, १२५ युनिट मोफत वीज, ५ लाखापर्यंत मोफत उपचार, ५० लाख नवीन घरे, सामाजिक सुरक्षा पेन्शन यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा –
राज ठाकरेंचा मोठा इशारा! शिवरायांच्या किल्ल्यांवर ‘नमो पर्यटन केंद्र’ उभारल्यास फोडून टाकणार
शेतकऱ्यांचे कर्ज कधी माफ करणार? देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखच सांगितली
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








