Raj Thackeray on Election Commission : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर टीका केली आहे. दुबार मतदार नोंदणीचा (Duplicate Voter Registration) वाद सुरू असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज ठाकरे संतप्त झाले आहेत.
त्यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
Raj Thackeray on Election Commission : राज ठाकरे काय म्हणाले?
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप पाहून आपली तळपायाची आग मस्तकात गेल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी आयोगावर थेट आरोप करत म्हटले:
“आता 100 टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. प्रत्यक्षात हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे.”
दुबार मतदार नोंदणी, मतदार यादीतील घोळ आणि यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आयोग समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही, याचा दाखला देत राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, “या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांचं करायचं काय?”
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या… pic.twitter.com/DizmmWTOkH
— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2025
जनतेला क्लिप पाहण्याचे आवाहन
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला ही क्लिप पाहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ‘तुमच्या मतदानाच्या ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे, हे तुम्हाला कळेल.’ तसेच, पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाची कोंडी करणाऱ्या पत्रकारांचे त्यांनी अभिनंदनही केले. दुबार मतदार नोंदणीच्या मुद्द्यावरून त्यांनी यापूर्वी ‘सत्याचा मोर्चा’ काढला होता आणि दुबार मतदार दिसल्यास त्यांना ‘ठोकून काढा’ असा इशाराही दिला होता.
Nagar Parishad Election : निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर
राज्यात दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असतानाही, राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे:
| तपशील | तारीख |
| अर्ज दाखल करण्यास सुरुवात | 10 नोव्हेंबर 2025 |
| अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत | 21 नोव्हेंबर 2025 |
| मतदान | 2 डिसेंबर 2025 |
| मतमोजणी | 3 डिसेंबर 2025 |
हे देखील वाचा – Swachh Survekshan: देशातील स्वच्छ सर्वेक्षणात मुंबई शहराची वाईट कामगिरी









