ISRO Mangalyaan- 2 – मंगळ ग्रहाच्या कक्षेत अंतराळ यान पाठवण्याची ऐतिहासिक मंगलयान मोहीम पार पाडणारी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आगामी सन 2030 मध्ये ‘मंगलयान-2’ ही (ISRO Mangalyaan-2) मोहीम हाती घेणार आहे. या मोहिमेत इस्रो पहिल्यांदाच मंगळाच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे.5 नोव्हेंबर 2013 रोजी इस्रोने मंगलयानचे यशस्वी प्रक्षेपण केले. या मोहिमेत यान मंगळाच्या कक्षेमध्ये पाठवण्यात आले. ती मोहीम ऐतिहासिक ठरली. कारण असे करणारा भारत हा पहिला आशियाई देश आणि पहिल्याच प्रयत्नात मोहीम यशस्वी करणारा जगातील पहिला देश ठरला.
मंगळयान 2013 पासून 2022 पर्यंत मंगळाच्या कक्षेत कार्यरत होते. या कालावधीत मंगळावरील वातावरण, तेथील खनिजे याबद्दल अत्यंत बहुमुल्य अशी माहिती मंगलयानने इस्रोला दिली.आता एक पाऊल पुढे जात इस्रोने ‘मंगलयान-2’ ही मोहीम आखली आहे. या मोहिमेत अंतराळ यान प्रत्यक्ष मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरवण्यात येणार आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी काल एका जाहीर कार्यक्रमात या मोहिमेबद्दल अधिकृत माहिती दिली. कोणत्याही ग्रहावर अंतराळ यान पाठवण्याच्या मोहिमेचे साधारणपणे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात त्या ग्रहाच्या जास्तीत जास्त जवळ यान पाठवले जाते. याला ‘फ्लाय बाय’ असे म्हणतात. ‘फ्लाय बाय’ मोहिमेत यान त्या ग्रहाच्या जवळून निघून जाते. तेवढ्या कालावधीत ग्रहाची छायाचित्रे यानावरील कॅमेर्याद्वारे टिपली जातात. दुसर्या टप्प्यात यान त्या ग्रहाच्या कक्षेत पाठवले जाते. काही वर्षे हे यान ग्रहाच्या कक्षेत प्रदक्षिणा घालून ग्रहाची जास्तीत जास्त माहिती मिळवते. याला ऑर्बिटर मिशन म्हणतात. मंगलयान हे भारताचे ऑर्बिटर मिशन होते. तिसर्या टप्प्यात यान प्रत्यक्ष त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरवले जाते. हा तिसरा टप्पा अत्यंत गुंतागुंतीचा आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा असतो. ‘मंगलयान-2’ ही मोहीम हा मंगळ मोहिमेचा तिसरा टप्पा आहे. या मोहिमेनंतर अमेरिका, चीन आणि सोव्हिएट रशिया यांच्यानंतर मंगळावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. यामुळे भारताची अंतराळ संशोधनाची क्षमता आणखी वाढेल.
हे देखील वाचा –









