Tatkal Ticket Booking New Rule : पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांसाठी तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा आणि महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. गैरप्रकार कमी करण्यासाठी आणि तत्काळ बुकिंग अधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वेने पडताळणीची नवीन पायरी समाविष्ट केली आहे.
1 डिसेंबर 2025 पासून तत्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी प्रविष्ट करणे बंधनकारक असेल. हा ओटीपी दिल्याशिवाय तिकीट दिले जाणार नाही.
बदल करण्यामागचे कारण काय?
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन पडताळणी प्रणालीचा मुख्य उद्देश एजंट्स (Agents) आणि दलालांकडून होणारा तत्काळ कोट्याचा गैरवापर रोखणे हा आहे. हे लोक मोठ्या संख्येने त्वरित तिकीट बुकिंग करण्यासाठी वेगवान प्रणाली किंवा सामूहिक बुकिंग पद्धतीचा वापर करतात, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचण येते.
- पारदर्शकता: मोबाईल क्रमांकाशी जोडलेला ओटीपी अनिवार्य केल्यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होईल. यामुळे खऱ्या प्रवाशांना तिकीट काढणे सोयीचे होईल.
- गैरव्यवहार कमी: रेल्वेने या नव्या पद्धतीमुळे फसवणुकीचे बुकिंग कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या ट्रेनपासून होणार सुरुवात
पश्चिम रेल्वेने सुरुवातीला ही नवीन प्रणाली मुंबई सेंट्रल–अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस (12009/12010) मध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील आढावा घेतल्यानंतर, येत्या काही महिन्यांत ही प्रणाली इतर गाड्यांमध्येही विस्तारित करण्याची योजना आहे.
रेल्वेने प्रवाशांना बुकिंगच्या वेळी आपला मोबाईल फोन कार्यरत ठेवण्याचे आणि संपर्क तपशील अद्ययावत असल्याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे. ओटीपी येण्यास विलंब झाल्यास किंवा तो चुकीचा प्रविष्ट केल्यास बुकिंग रद्द होऊ शकते, असा इशाराही रेल्वेने दिला आहे.
हे देखील वाचा – Local Body Elections : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…









