Phule Wada Handout Sparks : महात्मा ज्योतिराव फुले यांचा ऐतिहासिक वाडा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या समता परिषदेला देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे.
हा वाडा छगन भुजबळ यांच्या समता परिषदेला देण्याच्या चर्चेला ब्रिगेडने ‘फुले-शाहू-आंबेडकर विचारांची हत्या’ असे संबोधले आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
संभाजी ब्रिगेडने आपल्या निवेदनात म्हटले की, महात्मा फुले वाडा ही केवळ एक इमारत नसून समतेची भूमी आहे. महात्मा फुले यांचे विचार सर्व समाजाला प्रेरणा देणारे असून ते कोणाचीही खाजगी मालमत्ता नाही. त्यामुळे हा वाडा भाड्याने किंवा देखभाल करण्याच्या नावाखाली कोणाला देऊ नये.
विशेषतः ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा छगन भुजबळ यांना हा वाडा देणे म्हणजे फुले विचारांचा अपमान आहे. ब्रिगेडने छगन भुजबळ यांच्यावर थेट टीका करताना एका जुन्या घटनेची आठवण करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘रिडल्स इन हिंदूइझम’ या पुस्तकावरील मोर्चानंतर भुजबळ यांनी मुंबईतील हुतात्मा चौक स्वच्छ केला होता.
बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील वाईट प्रथा उघड केल्याने त्यांना ते पुस्तक ‘वाईट’ वाटले होते. अशा व्यक्तीला महात्मा फुले वाडा देणे म्हणजे समता, बंधुता आणि विज्ञाननिष्ठ विचारांना बदनाम करण्यासारखे आहे, असा दावा संभाजी ब्रिगेडने केला.
संभाजी ब्रिगेडने पुढे म्हटले की, महात्मा फुले वाडा ‘महाराष्ट्र सदन’ बनवू नये. ज्या विचारांची सावली महात्मा फुलेंना नको होती, त्या वाईट प्रवृत्तींची सावली या पवित्र ठिकाणी पडू नये. हा वाडा सध्या पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून, तो तसाच ठेवावा आणि कोणत्याही पक्ष किंवा संघटनेच्या ताब्यात देऊ नये.
पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका हे या वाड्याचे संरक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, असेही ब्रिगेडने स्पष्ट केले.संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी इशारा दिला आहे की, सरकारने कोणत्याही दबावाला बळी पडून चुकीचा निर्णय घेतला तर संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडेल.
हे देखील वाचा –
मतदार यादीतील गोंधळ संपेना आदित्य ठाकरेंची आयोगावर टीका









