Rohit Sharma Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवत 2-1 ने मालिका जिंकली. विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 270 धावा उभारल्या.
भारताने यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर 271 धावांचे लक्ष्य सहज गाठले. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या गड्यासाठी 155 धावांची दमदार भागीदारी रचून विजयाचा पाया रचला.
विक्रमवीर रोहितची 75 धावांची खेळी
या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने 75 धावांची शानदार खेळी केली. त्याने 73 चेंडूंमध्ये 7 चौकार (Fours) आणि 3 षटकार लगावले. याच खेळीदरम्यान, 27 धावांवर पोहोचताच 38 वर्षीय रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावांचा टप्पा पार करण्याचा मोठा विक्रम केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा रोहित शर्मा जगातील 14 वा, तर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), विराट कोहली (Virat Kohli) आणि राहुल द्रविडनंतर (Rahul Dravid) हा विक्रम करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय
| फलंदाज | सामने | धावा | शतके | अर्धशतके |
| सचिन तेंडुलकर | 664 | 34,357 | 100 | 164 |
| विराट कोहली | 556 | 27,910 | 84 | 144 |
| राहुल द्रविड | 504 | 24,064 | 48 | 145 |
| रोहित शर्मा | 505 | 20,000* | 50 | 110 |
यशाचा टर्निंग पॉईंट
रोहित शर्माने आपल्या 20,000 धावांमधील बहुतांश धावा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये केल्या आहेत. 23 जून 2007 रोजी आयर्लंडविरुद्ध त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कारकिर्दीच्या सुरुवातीला तो मधल्या फळीत फलंदाजी करत असे आणि त्यामुळे त्याचा फॉर्म अस्थिर होता. मात्र, 2013 मध्ये MS धोनीनेत्याला सलामीवीर म्हणून खेळण्यास सांगितले आणि येथूनच त्याच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली.
सलामीवीर म्हणून रोहितने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात स्फोटक फलदाजांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) नाबाद 264 धावांची त्याची खेळी आजही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे.
मोठ्या स्पर्धांमध्ये त्याचा खेळ अधिक उजळून निघाला. 2019 च्या ICC विश्वचषकात (World Cup) पाच शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला.
रोहित शर्माने 2024 T20 विश्वचषक आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताचे नेतृत्व केले. तसेच, त्याने 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्येही सलामीवीर म्हणून यशस्वी पुनरागमन केले, पण 2025 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.









