New Airlines in India : भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात येत्या काळात प्रवाशांना प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने ३ नवीन एअरलाईन्सना विमान उड्डाणाची पूर्वतयारी सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. ‘शंख एअर’, ‘अल हिंद एअर’ आणि ‘फ्लायएक्सप्रेस’ या कंपन्यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी देण्यात आले आहे.
सध्या इंडिगो आणि एअर इंडिया यांसारख्या मोजक्या कंपन्यांच्या वर्चस्वामुळे प्रवाशांना अनेकदा महागड्या तिकिटांचा सामना करावा लागतो, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.
सरकारने नवीन एअरलाईन्सना का दिली परवानगी?
भारतात विमान प्रवाशांची संख्या दरवर्षी वेगाने वाढत आहे, परंतु त्या तुलनेत विमान कंपन्यांची संख्या मर्यादित आहे. सध्या देशात केवळ 9 स्थानिक एअरलाईन्स कार्यरत आहेत. ऑक्टोबरमध्ये ‘फ्लाय बिग’ या कंपनीने सेवा बंद केल्यामुळे हे संकट अधिक गडद झाले होते.
- इंडिगोचे वर्चस्व: सध्या भारतीय बाजारपेठेत इंडिगो आणि एअर इंडिया समूहाचा वाटा 90 टक्क्यांहून अधिक आहे. एकट्या इंडिगोचा वाटा 65 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
- प्रवाशांची गैरसोय: अलीकडेच इंडिगोच्या सेवेत झालेल्या व्यत्ययामुळे देशभरातील हजारो प्रवाशांचे हाल झाले होते. जेव्हा एखादी मोठी कंपनी अडचणीत येते, तेव्हा प्रवाशांकडे दुसरा पर्याय राहत नाही. ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी नवीन कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
कोणत्या आहेत या ३ नवीन एअरलाईन्स?
विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी या मंजुरीला दुजोरा दिला आहे. या नवीन कंपन्यांची ओळख आणि सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:
शंख एअर (Shankh Air): या कंपनीला आधीच एनओसी मिळाली असून ती 2026 पासून आपली सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.
अल हिंद एअर (Al Hind Air): ही केरळमधील ‘अलहिंद ग्रुप’ची कंपनी आहे. ट्रॅव्हल सेक्टरमधील त्यांचा प्रदीर्घ अनुभव प्रवाशांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
फ्लायएक्सप्रेस (FlyExpress): ही कंपनी देखील स्थानिक बाजारपेठेत उतरण्यासाठी सज्ज झाली असून या आठवड्यात त्यांना मंत्रालयाकडून एनओसी मिळाली आहे.
हे तिन्ही ऑपरेटर व्यावसायिक सेवा सुरू करण्यापूर्वी उर्वरित सर्व नियामक प्रक्रिया पूर्ण करतील.
विमान वाहतूक क्षेत्रातील आव्हाने आणि ‘उडान’ योजना
भारतात विमान वाहतूक व्यवसाय हा अत्यंत जोखमीचा मानला जातो. यापूर्वी जेट एअरवेज आणि गो फर्स्ट यांसारख्या मोठ्या कंपन्या आर्थिक संकटामुळे बंद पडल्या आहेत. सध्या इंडिगो, एअर इंडिया, आकासा एअर आणि स्पाइसजेट यांसारख्या 9 कंपन्या सेवा देत आहेत.
सरकारने ‘उडान’ योजनेच्या माध्यमातून लहान शहरे विमान सेवेने जोडण्याचे ध्येय ठेवले आहे. स्टार एअर आणि फ्लाय91 यांसारख्या कंपन्यांनी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून, नवीन ३ कंपन्यांच्या आगमनामुळे ही यंत्रणा अधिक भक्कम होईल.
हे देखील वाचा – Varsha Gaikwad: ‘ठाकरे बंधूंनी आम्हाला विचारात घेतले नाही’; मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका









