Karachi Shopping Mall Fire : पाकिस्तानमधील कराची शहरात एका गजबजलेल्या शॉपिंग मॉलमध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे, बचाव पथकांना इमारतीच्या ढिगाऱ्यातून आणखी आठ मृतदेह सापडले आहेत. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मॉलमधील एका दुकानात प्रथम आग लागली आणि काही वेळातच तिने रौद्र रूप धारण करत संपूर्ण मॉलमध्ये पसरली. आगीमुळे मॉलमध्ये प्रचंड धूर पसरला, ज्यामुळे आत अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, परिसरातील सिव्हिल हॉस्पिटलला तत्काळ सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, बचाव पथकांनी तात्काळ कारवाई करत मॉलमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आणि मदतकार्याला वेग दिला. या घटनेबाबत सिंध प्रांताचे राज्यपाल कामरान टेसोरी यांनी तीव्र चिंता व्यक्त करत प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंजार यांनी घटनास्थळाच्या परिसरातील वाहतूक इतर पर्यायी मार्गांवर वळवण्याचे निर्देश दिले असून, आगीच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी कराची पोर्ट ट्रस्ट परिसरातही भीषण आग लागली होती. या आगीत वीसहून अधिक कंटेनर पूर्णपणे जळून खाक झाले होते. या कंटेनरपैकी बहुतांश कंटेनरमध्ये इलेक्ट्रिक बॅटऱ्या साठवण्यात आल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे.
भीषण आगीमुळे इमारतीचे काही भाग कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू असून, अद्याप बेपत्ता असलेल्या ६५ हून अधिक नागरिकांचा शोध कराची अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याची अत्यंत काळजीपूर्वक तपासणी करण्यात येत असून, आधुनिक उपकरणांच्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे. दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेता बचावकार्य अत्यंत जोखमीचे ठरत असूनही जवान सातत्याने प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, अथक प्रयत्नांनंतर तब्बल २४ तासांहून अधिक कालावधीनंतर आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आग आटोक्यात आल्यानंतर आता ढिगाऱ्यांचे हटवणे आणि संभाव्य अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यावर भर देण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. घटनेनंतर इमारतींच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.









