Ajit Pawar Death : जनसामान्यांमध्ये ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याच्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध केले आहे. या दुःखद घडामोडीमुळे त्यांच्या अनुयायांच्या आणि सहकाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत.
याच संदर्भात, दीड वर्षांपूर्वी गडचिरोलीत आयोजित सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलेला हेलिकॉप्टर प्रवासातील थरारक अनुभव पुन्हा आठवला आहे. ते सांगतात की, “हेलिकॉप्टर ढगात शिरल्यावर पोटात गोळा आला होता,” अशा शब्दांत त्यांनी त्यावेळी जाणवलेली भीती आणि काळजाचा ठोका चुकवणारा अनुभव व्यक्त केला होता. आज ही आठवण गडचिरोलीकरांसाठी दु:खद स्मृती ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच जनतेच्या जवळ राहणारे आणि त्यांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहणारे नेते म्हणून ओळखले जात.
अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे ‘सुरजागड इस्पात’ या प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या आग्रहावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत १९ जुलै २०२४ रोजी नागपूरहून हेलिकॉप्टरने आले होते. त्या दिवशी अचानक हवामान बिघडले आणि हेलिकॉप्टर घनदाट ढगांच्या कचाट्यात सापडले. या थरारक प्रसंगाचे वर्णन करताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत, मिश्किलपणे सांगितले होते, “ढग इतके दाट होते की खालची जमीन दिसेनाशी झाली. वैमानिकाला काही सुचत नव्हते, आणि माझ्या तर पोटात अक्षरशः गोळा आला होता.”
आज, नेमकी तशीच एक हवाई सफर त्यांच्या जीवनासाठी काळाचा घाला ठरली आणि महाराष्ट्राचा हा कणखर आवाज कायमचा शांत झाला. त्यांच्या निधनाने राज्यातील राजकारण आणि जनतेमध्ये असलेला एक ठोस, संवेदनशील व कर्तृत्ववान नेत्याचा शून्य निर्माण झाले आहे.
मात्र त्याचवेळी फडणवीस शांत आणि निवांत दिसत असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. मी त्यांना म्हणालो,आपण ढगात जातो आहे. त्यावर ते म्हणाले होते, “दादा, माझे आजवर सहा अपघात झाले, पण मला काही झाले नाही, तुम्ही काळजी करू नका.” यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले होते, “देवेंद्रजी, तुम्ही तुमचे अपघात सांगत होता आणि मी इथे जीव मुठीत धरून पांडुरंगाचा जप करत होतो!” मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचा तो थरारक अनुभव सांगताना, दादांच्या चेहऱ्यावरचे भाव आजही गडचिरोलीकरांच्या स्मरणात ताजे आहेत.
अवघ्या एक दिवस आधी, म्हणजे २७ जानेवारी रोजी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील लोहखनिज वाहतुकीसाठी सुरजागड ते हेडरी या ८५ किलोमीटर लांब असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात आली. गडचिरोलीच्या विकासासाठी घेतलेला हा निर्णय उपमुख्यमंत्री पवार यांच्या कारकिर्दीतील शेवटचा प्रशासकीय निर्णय ठरला, जो त्यांच्या कार्यकाळातील प्रदेशाभिमानी वृत्तीचे आणि जनकल्याणासाठी असलेल्या प्रतिबद्धतेचे साक्षी आहे. त्यांच्या दूरदृष्टीच्या योजना आणि जनतेसाठी असलेल्या संवेदनशीलतेमुळे गडचिरोलीतील रहिवासी या निर्णयाबद्दल आजही कृतज्ञ आहेत.









