Ajit Pawar Dashkriya Vidhi : हाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर शोककळा पसरवणारी घटना म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेले दुर्दैवी निधन. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे प्राण गेल्यानंतर, आता त्यांच्या उत्तरकार्याबाबत आणि पवार कुटुंबाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
धार्मिक विधी आणि पुरोगामी पाऊल-
अजित पवार यांच्या पार्थिवावर २९ जानेवारी रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर ३० जानेवारीला अस्थी सावडण्याचा विधी पार पडला आणि त्याच दिवशी सोनगाव येथील कऱ्हा-नीरेच्या पवित्र संगमावर अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
सामान्यतः दहाव्या किंवा तेराव्या दिवशी होणारे धार्मिक विधी अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत साधेपणाने आणि पुरोगामी विचार जपत तिसऱ्या दिवशीच पूर्ण केले आहेत. अधिकच्या माहितीनुसार, आता कोणताही सार्वजनिक किंवा मोठा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नाही. उर्वरित सर्व विधी पवार कुटुंबीय घरगुती स्वरूपातच पूर्ण करणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली, तरी विधींचे आटोपशीर स्वरूप हे कुटुंबाच्या पुरोगामी धोरणाचे प्रतीक मानले जात आहे.
काटेवाडी येथे सांत्वनपर भेटींचा ओघ-
आज, बारामतीमधील काटेवाडी येथील ‘सहयोग’ या निवासस्थानी सांत्वनपर भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड येथे जाऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्या बारामतीत परतल्या. आज सकाळी १० वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत पवार कुटुंब सांत्वनपर भेटी स्वीकारणार आहे. अजितदादांच्या निधनानंतर त्यांचे सांत्वन करण्यासाठी राज्यभरातील नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची मोठी गर्दी काटेवाडीत पाहायला मिळत आहे.









