Mumbai Mayor: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून सुरू असलेला अनेक दिवसांचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून, भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या नव्या महापौर बनल्या आहेत. तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी यांची सव्वा वर्षांसाठी वर्णी लागली आहे. या निवडीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून ‘मराठी महापौर’ या वादावर आता पडदा पडला आहे.
नितेश राणेंचा सोशल मीडियावरून प्रहार
महापौर निवडीवर भाजप नेते नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, “बोललो होतो.. मुंबईचा महापौर.. हिंदू होणार… मराठी होणार.. महायुतीचाच होणार! जय श्री राम! मुंबई, महादेव!” राणे यांनी आपल्या पोस्टमधून ‘हिंदू आणि मराठी’ अस्मितेचा मुद्दा अधोरेखित करत विरोधकांना टोला लगावला आहे.
“आम्ही शब्द पाळला” – आशिष शेलार
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही या निवडीचे स्वागत करत मुंबईकरांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, हा आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला आहे. ज्यांना मराठी मुस्लिम महापौर करायचा होता, त्यांचा डाव मुंबईकरांनीच हाणून पाडला आहे.” रितू तावडे यांच्या निवडीमुळे मुंबईच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वादाची पार्श्वभूमी काय होती?
मुंबई महापौरपदाची ही निवडणूक विकासकामांपेक्षा ‘भाषिक अस्मितेच्या’ मुद्द्यावरून अधिक गाजली.
डिसेंबर 2025 पासून मुंबईचा महापौर मराठी असावा की अन्य भाषिक, यावरून राजकीय पक्षांमध्ये जुंपली होती. विरोधकांकडून मुस्लिम महापौर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महायुतीने केला होता, तर दुसरीकडे जागतिक शहरात भाषेचा मुद्दा नसावा असेही काहींचे मत होते.
अखेर रितू तावडे यांच्या रूपाने ‘मराठी आणि हिंदू’ चेहरा देऊन भाजपने या वादाला पूर्णविराम दिला आहे.









