Navi Mumbai International Airport Di Ba Patil name: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून भूमिपुत्रांकडून लावून धरण्यात आली होती. या मागणीसाठी आगरी-कोळी समाजाने अनेकदा तीव्र आंदोलने केली आहेत.
आता या मागणीला यश येताना दिसत असून, लवकरच विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाणार असल्याची माहिती भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव सादर होणार
खासदार म्हात्रे यांनी नुकतीच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला.
“अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार या विषयावर सकारात्मक असून, लवकरच स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीचा विजय होईल,” अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संसदेतही आपण वारंवार हा विषय उपस्थित केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
भिवंडीकरांना दिलासा: रेल्वे सेवा होणार सुलभ
केवळ विमानतळाचा प्रश्नच नाही, तर भिवंडीतील प्रवाशांच्या सोयीसाठीही रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचे खासदार म्हात्रे यांनी सांगितले. भिवंडी रोड रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या न थांबल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.
याबाबत रेल्वे मंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:
- गाड्यांना थांबा: दिवा-वसई मार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांपैकी ३ प्रमुख गाड्या आता भिवंडी रोड स्थानकावर थांबणार आहेत.
- मुंबई सीएसटी कनेक्टिव्हिटी: वाशिंद येथील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गीकेचे काम पूर्ण झाल्यानंतर, दिवा-वसई मेमू ट्रेन थेट मुंबई सीएसटी पर्यंत नेण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे.
या निर्णयामुळे भिवंडी आणि आसपासच्या परिसरातील हजारो प्रवाशांचा रोजचा प्रवास अधिक सुसह्य होणार आहे. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळणे हा येथील स्थानिक जनतेचा मोठा विजय मानला जात असून, या घोषणांमुळे सर्वस्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.










