Ashok Kharat : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याच्या अघोरी आणि विकृत कृत्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू लागले आहेत. एका वृत्तपत्राच्या संपादकाने एका मुलाखतीत खरातच्या काळ्या साम्राज्याबद्दल खळबळजनक दावे केले आहेत. खरातने केवळ सर्वसामान्यच नव्हे, तर उच्चशिक्षित महिला, सरकारी अधिकारी आणि राजकीय कुटुंबातील अशा २०० पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केले असावे, असा प्राथमिक अंदाज खेमनार यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
त्यांनी केलेल्या खुलाशानुसार, खरात महिलांना संमोहित करून किंवा गुंगीची औषधे देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची चर्चा होती. मात्र, वास्तवात तो स्वतःला ‘देव’ असल्याचे भासवून महिलांची दिशाभूल करत असे. “तुझे आयुष्य सुखकर करण्यासाठी मला तुझे ‘योनी शुद्धीकरण’ करावे लागेल,” असे अघोरी तर्क सांगून तो पीडित महिलांना स्वतःचे मूत्र प्राशन करण्यास भाग पाडत असे, असा घृणास्पद दावा खेमनार यांनी केला आहे. श्रद्धेच्या नावाखाली महिलांच्या असहायतेचा फायदा घेऊन चालवलेला हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.
आर्थिक फसवणुकीच्या बाबतीतही खरातने कोणालाही सोडले नाही. एका व्यावसायिकाला व्यवसायात तोटा झाल्याने तो मार्गदर्शनासाठी खरातकडे आला असता, त्याला साडेपाच लाख रुपयांना खोटी रत्ने विकून त्याची फसवणूक करण्यात आली. खरातच्या या कृष्णकृत्यांमध्ये ब्लॅकमेलिंगचाही मोठा सहभाग होता. त्याने एका बड्या उद्योजकाचे दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध जुळवून दिले आणि नंतर ती महिला गर्भवती असल्याचे खोटे सांगून त्या उद्योजकाला भीती घातली. या भीतीपोटी खरातने त्या उद्योजकाकडून तब्बल २० कोटी रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खरातचे धागेदोरे राजकारणातील बड्या धेंडांपर्यंत पोहोचले होते. महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्याला तो ‘ओशनो जल’ या नावाने बाटलीबंद पाणी देत असे. वास्तवात ते पाणी म्हणजे शक्तीवर्धक गोळ्यांचे मिश्रण असायचे. “हे पाणी प्यायल्याने तू अधिक ऊर्जावान होशील आणि तुझी प्रकृती सुधारेल,” असे सांगून त्याने या मंत्र्याचीही फसवणूक केली होती.










