Are We Terrorists? Cockroach Dipke Slams Govt Over Protest Restrictions- नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे बेमुदत आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. काल हे आंदोलन सुरू झाले. रात्री आंदोलक मैदानावर उघड्यावरच झोपले. मंत्र्याने राजीनामा दिल्याशिवाय हटणार नाही असा निर्धार दिपके यांनी केला आहे. कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज पोस्ट करीत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की आंदोलनस्थळी पाणी, अन्न आणि वीजपुरवठा रोखण्यात आला आहे. आम्हाला त्रास दिला जात आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढत आहोत, मग आम्हाला दहशतवाद्यांसारखी वागणूक का दिली जात आहे? असा संतप्त सवाल केला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत दीपके यांनी देशभरातील विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि कामगारांना जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही केले. आज नीटची परीक्षा देऊन विद्यार्थ्यांनी आंदोलनात सामील व्हावे असे आवाहनही त्याने केले .
दिल्ली पोलिसांनी काल सायंकाळी आंदोलनाची परवानगी संपल्याचे सांगून आंदोलकांना जागा रिकामी करण्यास सांगितले होते. मात्र पर्यायी जागा मिळेपर्यंत जंतर-मंतरवरील धरणे सुरूच ठेवण्याचा निर्णय अभिजित दीपके यांनी घेतला. पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही आंदोलकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन सुरू ठेवत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. हातात फलक घेत, थाळ्या आणि चमचे वाजवून त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला
अभिजित दीपके म्हणाले की, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. पेपरफुटी का होत आहे? कारण त्यांना कोणतीही भीती नाही. त्यांना वाटत नाही की त्यांनी निष्काळजीपणा केला म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जाईल. जेव्हा एखाद्या मंत्र्याची खुर्ची जाईल, तेव्हाच मनात भीती निर्माण होईल. त्यानंतर जो कोणी मंत्री बनेल, त्यालाही ही जाणीव असेल की पेपरफुटी झाली तर पद गमवावे लागू शकते. सध्या ही भीतीच नसल्यामुळे वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. याबाबत सरकारशी कोणतीही चर्चा झालेली नाही. उलट सरकार आमचे पाणी बंद करत आहे, आमचे अन्न रोखत आहे, आमची वीज तोडत आहे. आम्हाला दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. आम्ही विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी लढत आहोत, तरीही आम्हाला अशी वागणूक का दिली जात आहे?
मी सर्व नीट विद्यार्थ्यांना विनंती करतो की, आधी तुम्ही तुमची परीक्षा द्या. माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा. परीक्षा संपल्यानंतर तुमचे मित्र आणि कुटुंबीयांसह जंतर-मंतर येथे या. कारण ही लढाई धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय थांबणार नाही. आमचा सध्या उपोषणाचा कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवत आहोत. मात्र गरज पडली, तर उपोषणाचाही मार्ग स्वीकारू.मला अटक झाली किंवा येथे उपस्थित असलेल्या लोकांना अटक झाली तर देशभरातील युवक रस्त्यावर उतरतील. हे आंदोलन आधीच उभे राहिले आहे. कारण हा प्रश्न एका विद्यार्थ्याचा नाही. एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. हे सर्व विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी लढतील. सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही उलट ते आम्हाला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत आहे.त्यामुळे आम्ही आंदोलन अधिक तीव्र करण्यास तयार आहोत.










