Lohagad Death Case : पुण्यातील विख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र केतन अग्रवाल (वय २५ वर्षे) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून, पुणे ग्रामीण पोलीस या हत्येच्या तपासात रोज नवे आणि धक्कादायक खुलासे करत आहेत. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी काल मध्यरात्री पुणे ग्रामीण पोलिसांनी एका अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली. पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ‘क्राईम सीन रिक्रिएशन’ म्हणजेच संपूर्ण गुन्ह्याचे प्रात्यक्षिक घडवून आणले. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीप सिंह गिल यांनी स्वतः रात्री उशिरा लोहगडावर उपस्थित राहून घटनास्थळाची सखोल आणि अत्यंत बारकाईने पाहणी केली.
प्रवेशद्वारापासून दरीपर्यंतच्या मार्गाची सूक्ष्म तपासणी-
तपासादरम्यान केतन अग्रवाल, मुख्य संशयित महिला सिया गोयल आणि तिचा साथीदार चेतन चौधरी हे तिघे ज्या दिवशी लोहगडावर आले, त्या क्षणापासून ते थेट हत्येच्या थरारापर्यंत नेमके काय घडले, याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी पुन्हा एकदा पडताळून पाहिला. किल्ल्याच्या तिकीट खिडकीवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये हे तिघे ज्या मार्गाने जाताना दिसत होते, तिथपासून ते थेट लोहगडावरील ज्या खोल दरीतून केतनला खाली ढकलण्यात आले, त्या मुख्य घटनास्थळापर्यंतच्या संपूर्ण परिसराची पोलिसांनी पाहणी केली. आरोपींची शारीरिक हालचाल कशी होती, त्यांनी केतनला कोणत्या जागी गाठले आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांचा या परिस्थितीशी कसा ताळमेळ बसतो, या सर्व तांत्रिक बाबींचे विश्लेषण यावेळी करण्यात आले.
न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे: पोलीस अधीक्षक
या मोहिमेबाबत अधिकृत माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल म्हणाले की, “कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासात प्रत्यक्ष घटनास्थळाचे भौगोलिक निरीक्षण करणे अत्यंत अनिवार्य असते. तपास अधिकाऱ्यांनी ही महत्त्वपूर्ण कायदेशीर प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. केतनला ज्या ठिकाणाहून धक्का देण्यात आला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह दरीत नेमका कुठे जाऊन पडला, या दोन्ही ठिकाणांमधील अंतर आणि तेथील खडतर भौगोलिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रात्री गडावर कार्यरत होते.” आरोपींवर न्यायालयात गुन्हा सिद्ध व्हावा आणि त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, या दृष्टीने हा परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयात अत्यंत मोलाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोपींची बचावाची रणनीती; एकमेकांवरच दोषारोप-
दुसरीकडे, पोलीस कोठडीत असलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असताना, त्यांनी आता स्वतःचा बचाव करण्यासाठी एकमेकांवर दोषारोप करण्यास सुरुवात केली आहे. आरोपी चेतन चौधरीने पोलिसांना दिलेल्या जबाबात असा दावा केला आहे की, त्याला केवळ सियासोबत पळून जायचे होते, परंतु केतनचा काटा काढण्याचा आणि त्याची हत्या करण्याचा संपूर्ण हट्ट सियानेच धरला होता. या उलट, सिया गोयलने चेतनचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, केतनच्या हत्येचा कट पूर्णपणे चेतनच्याच डोक्यातील सुपीक सुपीक डोक्याचे फळ होते, असा प्रतिदावा केला आहे. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि संभाव्य शिक्षेची तीव्रता कमी करण्यासाठी आरोपींनी अवलंबलेली ही एक बचावात्मक रणनीती असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांची एन्ट्री; प्रकरणाला कायदेशीर वळण-
या संपूर्ण प्रकरणाला आता न्यायालयीन स्तरावर मोठे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी देशातील आणि सर्वोच्च न्यायालयातील अग्रगण्य व ज्येष्ठ विधीज्ञ एडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या घडामोडीवर भाष्य करताना ॲड. श्रीवास्तव म्हणाले, “सध्या हे प्रकरण प्राथमिक तपासाच्या टप्प्यात आहे. माझी पक्षकार तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत असून, भविष्यातही करेल. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आणि आरोपीला न्यायालयात आपली बाजू मांडण्याचा कायदेशीर अधिकार दिला आहे.









