अप्पर वैतरणा तलाव आटला ! पाणीसाठा १.५६ टक्क्यावर राखीव कोट्यातील पाणी वापरणार !

मुंबई – मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव आटला आहे. सध्या या तलावात केवळ १.५६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. इतर तलावांतील पाणीसाठाही कमी झाला आहे. सात तलावांमध्ये सध्या १० टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे आता राखीव कोट्यातील पाण्याने मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे.

वास्तविक मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस दाखल झालेला नाही. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी घसरत आहे.शहराला दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणार्‍या भातसा तलावातील पाणीसाठाही कमी होत आहे.या तलावात ७.८९ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.या तलावात ७ लाख १७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.पण सध्या ५६ हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. अन्य तलावांतील पाणीसाठाही दिवसेंदिवस खालावत आहे. तानसा तलावातील पाणीसाठा १० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आता पालिकेने राखीव कोट्यातून पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.