जयपूर – राजस्थानमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून गुर्जर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. काल त्यांनी आरक्षणाच्या मागणीवरून रेल रोको आंदोलन केले. आंदोलकांनी दिल्ली-मुंबई रेल्वे मार्ग सुमारे दोन तास रोखून धरला.
भरतपूर जिल्ह्यातील पिलुपुरामध्ये गुर्जर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने काल गुर्जर महापंचायतीचे आयोजन करण्य़ात आले होते. महापंचायतीमध्ये आरक्षणाबाबत राज्य सरकारने प्रस्तावित केलेला मसुदा मान्य करण्यात आला. मात्र त्यानंतर अचानक महापंचायतीला उपस्थित असलेल्या एका गटाने रेलरोको आंदोलन पुकारले. या गटाला महापंचायतमध्ये झालेला सरकारचा मसुदा स्वीकारण्याचा निर्णय मान्य नव्हता.
मागील अनेक वर्षांपासून गुर्जर आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे दिवंगत किरोरी सिंग बैंसला यांचे पुत्र विजय बैंसला यांनी महापंचायत बोलावली होती. घटनेच्या ९ व्या परिशिष्टामध्ये गुर्जर समाजातील अति मागास वर्गासाठी ५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्याच्या मागणीसाठी हे रेलरोको आंदोलन करण्यात आले.