नवी दिल्ली- पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. तो एक दिवस स्वतःहून भारतात सामील होईल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी दहशतवादात सहभागी असलेल्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे म्हणत पाकिस्तानला थेट इशारा दिला.
राजनाथ सिंह दिल्लीत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. देशाची संरक्षण व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक सक्षम व बळकट झाली आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारताने ठोस पावले उचलली आहेत. दहशतवादात सामील होणाऱ्यांना आता मोठी किंमत मोजावी लागत आहे.
ते पुढे म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोक हे आपलेच आहेत. मात्र त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की, एक दिवस तो स्वतःहून भारतात सामील होईल. पाकव्याप्त काश्मीरची स्थिती महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंह यांच्यासारखी आहे. शक्ती सिंह काही काळासाठी वेगळे झाले होते, पण ते आपल्या भावाकडेच परतले. त्याचप्रमाणे पाकव्याप्त काश्मीरसुद्धा सध्या आपल्यापासून दूर असला तरी तो पुन्हा भारतात सामील होईल.
राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानला हे समजले आहे की, दहशतवादाला प्रोत्साहन देणे परवडणारे नाही. आता जेव्हा चर्चा होईल, तेव्हा ती पाकव्याप्त काश्मीरवर आणि दहशतवादावर असेल. आम्ही मोदीजींच्या एक भारत, महान भारताच्या संकल्पाशी वचनबद्ध आहोत.
