महाकुंभतील चेंगराचेंगरीचे बळी किती? बीबीसी म्हणते 82! योगी म्हणतात 37!

नवी दिल्ली- उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमधील कुंभमेळ्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत नेमके किती भाविकांचे बळी गेले याबाबत बीबीसी हिंदी वृत्तवाहिनीने अलिकडे केलेल्या दाव्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. चेंगराचेंगरीतील बळींच्या संख्येबाबत उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने खरी माहिती दडवली असा आरोप काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने वारंवार केला होता. त्याला बीबीसीच्या वृत्तामुळे बळ मिळाले आहे. योगी सरकारच्या आकडेवारीनुसार चेंगराचेंगरीत 37 जणांचे बळी गेले. पण बीबीसीने गोळा केलेल्या माहितीमधून हा आकडा 82 असल्याचे उघड झाले आहे. या दाव्यामुळे पुन्हा खळबळ माजली आहे.
चेंगराचेंगरीत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना आणि गंभीर जखमी झालेल्यांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईबाबत राज्य सरकारने दिलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष देण्यात आलेली नुकसानभरपाई यातील तफावतही बीबीसीच्या वार्ताहराने शोधून काढली आहे. त्याला मिळालेल्या माहितीनुसार सरकारने 36 कुटुंबांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्या 26 जणांना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसानभरपाई दिली. याचा अर्थ 37 पैकी 36 बळींच्या कुटुंबियांना सरकारने नुकसान भरपाई दिली. मग एका बळीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई का दिली नाही,असा प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट सरकारने गंभीर जखमी झालेल्यांची आकडेवारी जाहीर केलेलीच नाही. मग गंभीर जखमी झालेले 26 जण कोण आहेत असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
बीबीसीने दावा केला आहे की त्यांच्या वार्ताहराने 29 जानेवारी रोजी मौनी अमावास्येनिमित्त आयोजित शाही स्नानाच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीतील बळींची संख्या नेमकी किती हे जाणून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला. देशभरातील 11 राज्य आणि 50 हून जास्त जिल्हयांना भेट देऊन महाकुंभला जाऊन आलेल्या शंभरहून अधिक कुटुंबांना भेटून ही आकडेवारी गोळा केली आहे.
चेंगराचेंगरीबाबत उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार लपवाछपवी करत आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकड्यापेक्षा प्रत्यक्ष बळी गेलेल्यांची संख्या जास्त आहे,असा आरोप सुरुवातीपासून काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि अन्य विरोधी पक्ष करत होते. त्यांनी बीबीसीने शेअर केलेल्या या पोस्टचा आधार घेत योगी सरकारने आता तरी बळींचा खरा आकडा जाहीर करावा,अशी मागणी केली आहे. बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार सरकारने 35 कुटुंबांना प्रत्येकी 25 लाख रुपये बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून दिल्याचे सांगितले होते. मात्र तशी कोणतीही अधिकृत नोंद सरकारकडे नाही.
त्याव्यतिरिक्त बीबीसीला अशी 26 कुटुंबे आढळली ज्यांच्या कुटुंबातील सदस्याचा चेंगराचेंगरी बळी गेला. पण त्यांची नावे सरकारने मृतांच्या यादीत समाविष्ट केलेली नाही. या 26 कुटुंबांना सरकारने परस्पर पाच-पाच लाख रुपये रोखीने दिले.
या कुटुंबियांनी त्याचे पुरावे छायाचित्रे आणि व्हिडिओ बीबीसीला दिले आहेत. बीबीसीला या कुटुंबियांकडून असे काही फोटो आणि व्हिडिओ मिळाले की ज्यामध्ये पोलीस अधिकारी त्यांना पाचशे रुपयांच्या नोटांची बंडले देताना दिसत आहेत. हे पैसे सरकारी तिजोरीतून काढण्यात आल्याची कोणतीही नोंद उत्तर प्रदेश सरकारकडे असल्याचे बीबीसीला आढळले नाही. त्यामुळे या 26 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये असे मिळून 1 कोटी 30 लाख रुपये नेमके आले कुठून हेही एक कोडे आहे.