सीमा सुरक्षा दलाने घुसखोरी रोखण्यासाठी ‘डीआरडीओ’ची मदत मागितली

नवी दिल्ली – देशात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशींना शोधून परत पाठवण्याचे अभियान वेगाने सुरू झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेकडे (डीआरडीओ) मदत मागितली आहे. सुंदरबन भागातील ११३ किमी सीमेवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोन, रडार आणि उपग्रह-आधारित यंत्रणा तैनात करण्याची मागणी बीएसएफने डीआरडीओकडे केली आहे. गृह मंत्रालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.

सुंदरबन हा घनदाट खारफुटीच्या जंगलांनी वेढलेला असल्यामुळे येथे बेकायदेशीर घुसखोरीचे प्रमाण जास्त आहे. बीएसएफ सध्या या परिसरातील १२३ किमी परिसरावर लक्ष ठेवते आणि ८ तरंगत्या सीमा चौक्या (बीओपी) तसेच ९६ बोटींच्या माध्यमातून गस्त ठेवली जाते. मात्र तरीही काही दहशतवादी संघटना समुद्री मार्गाने किंवा सुंदरबनच्या जंगलातून भारतात घुसण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे याठिकाणी अधिक तांत्रिक देखरेख यंत्रणा तैनात करण्याचा प्रस्ताव डीआरडीओला देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम बंगाल सरकारकडे निरीक्षण मनोरे उभारण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याआधीच सुंदरबनमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे आणि सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये गुप्तचर समन्वय अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे.