Ahmedabad Air India Plane Crash : कॅप्टन सुमित सभरवाल (Captain Sumeet Sabharwal) यांच्या ९१ वर्षीय वडिलांनी अहमदाबाद विमान अपघाताच्या (Ahmedabad Air India Plane Crash) न्यायालयीन देखरेखीखाली चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले, ज्यामुळे विमानातील २३० पैकी २२९ जणांचा मृत्यू झाला. फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) सोबत दाखल केलेल्या रिट याचिकेत, कॅप्टन सभरवाल यांच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयाला विविध एजन्सींनी सादर केलेले मागील सर्व तपास अहवाल बंद आणि अनिर्णीत मानले पाहिजेत अशी विनंती केली आहे.
पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना पारदर्शकता, जबाबदारी आणि न्याय मिळावा यासाठी सर्व पुरावे आणि तपास साहित्य न्यायालयीन देखरेखीखाली स्वतंत्र समितीकडे हस्तांतरित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेत सुरुवातीच्या तपास प्रक्रियेतील कथित त्रुटींवरही प्रकाश टाकण्यात आला आहे आणि अपघाताला कारणीभूत असलेल्या तांत्रिक, ऑपरेशनल आणि सुरक्षितता घटकांची पुनर्तपासणी करण्यासाठी न्यायालयाने तज्ञ समितीची स्थापना करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या समितीचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी करावे . त्याचप्रमाणे यामध्ये हवाई वाहतूक आणि विमानाच्या तज्ज्ञ तंत्रज्ञांचा समावेश करावा. या आधी केलेल्या चौकशीचा १२ जुलै रोजी सोपवलेला अहवालही रद्द् समजण्यात यावा. या चौकशीत विश्वासार्हता व पारदर्शकता नाही. विमानातील तांत्रिक दोषापेक्षा अपघाताचा सर्व दोष वैमानिकांच्या माथी मारण्यात आला आहे. माझ्या मुलाच्या मानसिक दडपणाचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.प्रत्यक्षात त्याचा घटस्फोट १५ वर्षांपूर्वी झाला होता व त्याच्या आईचे निधन एक वर्षापूर्वी झाले होते. त्यानंतर त्याने शेकडो वेळा उड्डाण केले आहे.त्यामुळे त्या गोष्टींचा माझ्या मुलावर मानसिक ताण होता असे म्हणणे चुकीचे आहे. असे या याचिकेत म्हटले आहे.
हे देखील वाचा – Canteen Cleared, Setback for MLA Gaikwad : आमदार गायकवाडना झटका कॅन्टीनचे जेवण उत्तमच होते