Air India Boeing 787 Grounding Demand: एअर इंडियाद्वारे वापरल्या जाणाऱ्या बोईंग 787 ड्रीमलायनर (Boeing 787 Dreamliner) विमानांच्या संपूर्ण ताफ्याची उड्डाणे तात्काळ थांबवण्याचीमागणी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (Federation of Indian Pilots) या वैमानिकांच्या संघटनेने केली आहे. या मागणीचे पत्र संघटनेने केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांना लिहिले आहे.
‘AI-171’ अपघातानंतर सुरक्षेचा प्रश्न
FIP ने आपल्या पत्रात AI-171 विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांमध्ये अनेक तांत्रिक बिघाड झाल्याचे नमूद केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बोईंग B-787s विमानांमधील बिघाडांच्या कारणांची चौकशी न केल्यामुळे विमान प्रवासाच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे.
पत्रातील प्रमुख मागणी:
- सर्व विमानांची उड्डाणे थांबवा: एअर इंडियाच्या सर्व B-787 विमानांची उड्डाणे थांबवावीत.
- तपासणी: या विमानांची, विशेषत: त्यांच्या इलेक्ट्रिकल सिस्टम्स आणि इतर वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींची कसून तपासणी करावी.
घडलेल्या दोन मोठ्या तांत्रिक घटना
संघटनेने अलीकडेच B-787 विमानांमध्ये घडलेल्या दोन तांत्रिक बिघाडांचा उल्लेख केला आहे.
4 ऑक्टोबर रोजी बर्मिंगहॅम येथे लँडिंग करताना एअर इंडियाच्या फ्लाईट 117 मध्ये रॅम एअर टर्बाइन आपोआप कार्यान्वित झाले होते. 9 ऑक्टोबर रोजी व्हिएन्नाहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईट 154 मध्ये अनेक तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाला दुबईकडे वळवावे लागले.
मंत्र्यांकडे ऑडिटची मागणी
या पत्रात वैमानिक संघटनेने मंत्र्यांकडे तीन प्रमुख विनंत्या केल्या आहेत. यात DGCA (Directorate General of Civil Aviation) च्या फ्लाईट सेफ्टी डायरेक्टरेट, एअर सेफ्टी आणि एअरवर्थिनेस विभागातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून एअर इंडियाचे विशेष ऑडिट करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मंत्र्यांनी घेतली बैठक
या पार्श्वभूमीवर, नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी देशांतर्गत विमान कंपन्यांसोबत त्यांच्या कार्यात्मक आणि तांत्रिक कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी मासिक आढावा बैठक घेतली. यात एअर इंडिया (Air India), इंडिगो (IndiGo), अकासा एअर (Akasa Air) यांसारख्या बहुतांश विमान कंपन्यांनी सहभाग घेतला. नायडू यांनी सुरक्षेच्या नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे आणि प्रवाशांसाठी उत्तम सेवा पुरवण्याचे निर्देश दिले.
हे देखील वाचा – ‘भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढण्याचे मुख्य कारण…’; अमित शाह यांचा मोठा दावा