Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या भीषण विमान अपघाताने सर्वांनाच हादरून सोडलं. या दुर्घटनेत ‘एअर इंडिया’च्या ‘AI 171’ या फ्लाईटमधील 241 पैकी 240 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने ‘AI 171’ आणि ‘IX 171’ हे फ्लाईट नंबर्स कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अपघातात बळी पडलेल्या आत्म्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आणि प्रवाशांच्या भावनांचा विचार करून घेण्यात आला आहे.
अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जाणारं बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमान टेक-ऑफ केल्यानंतर काही क्षणांतच कोसळलं. ही फ्लाईट ‘AI 171’ या नंबरने ओळखली जात होती. रिपोर्टनुसार, अशा मोठ्या दुर्घटनेनंतर फ्लाईट नंबर बंद करणं ही विमान कंपन्यांची नेहमीची बाब आहे. त्यानुसार, आता अहमदाबाद-लंडन गॅटविक मार्गावरील विमान ‘AI 171’ ऐवजी ‘AI 159’ या नव्या फ्लाईट नंबरने उड्डाण करेल.
एअर इंडिया एक्सप्रेसचाही निर्णय
एअर इंडिया एक्सप्रेसनेही आपला ‘IX 171’ हा फ्लाईट नंबर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 2020 मध्ये कोझिकोड येथे झालेल्या विमान अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हाही एअर इंडिया एक्सप्रेसने त्या फ्लाईटचा नंबर बंद केला होता. अशा निर्णयांमागे प्रवाशांच्या भावनांचा आदर आणि अपघाताच्या दुखद आठवणी टाळण्याचा हेतू असतो.
या अपघाताने अहमदाबादसह संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. एअर इंडियाने अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीची देखील घोषणा केली आहे.