Arunachal Pradesh Woman Detained Shanghai Airport : अरुणाचल प्रदेशच्या एका भारतीय महिलेने चीनच्या अधिकाऱ्यांवर शांघाय पुडोंग विमानतळावर (Shanghai Pudong Airport) तब्बल 18 तास ताब्यात घेऊन त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. पेमा वांग थोंगडोक (Pema Wang Thongdok) असे या महिलेचे नाव असून, त्या युनायटेड किंगडममध्ये (UK) राहतात.
चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट ‘अवैध’ ठरवल्यामुळे त्यांना अडवून ठेवण्यात आले, असे त्यांनी सांगितले आहे. 21 नोव्हेंबर 2025 रोजी लंडनहून जपानला जात असताना शांघायमध्ये थांबा असताना ही घटना घडली.
पासपोर्ट ‘अवैध’ ठरवण्यामागील कारण
थोंगडोक यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट्स शेअर करत या घटनेची माहिती दिली. त्यांनी आरोप केला आहे की, चिनी अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट अवैध ठरवला, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे जन्मस्थान ‘अरुणाचल प्रदेश, हा चीनचा भाग आहे.’
थोंगडोक यांनी लिहिले आहे की, “21 नोव्हेंबर 2025 रोजी मला शांघाय विमानतळावर 18 तासांपेक्षा जास्त वेळ ताब्यात घेण्यात आले. कारण चीन इमिग्रेशन आणि चायना ईस्टर्न एअरलाईन्सने माझा भारतीय पासपोर्ट अवैध ठरवला, कारण माझा जन्म अरुणाचल प्रदेशमध्ये झाला आहे, जो त्यांचा भूभाग असल्याचा दावा त्यांनी केला.”
नंतरच्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या जन्मस्थानामुळे त्यांच्या भारतीय नागरिकत्वावरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. थोंगडोक यांना या काळात जेवण नाकारण्यात आले, त्यांची पुढील कनेक्टिंग फ्लाईट पकडण्यापासून रोखण्यात आले आणि त्यांना चायना ईस्टर्न एअरलाईन्सची नवी तिकीट खरेदी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.
भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान
इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका अधिकाऱ्याने त्यांचा पासपोर्ट जमा केला आणि “अरुणाचल, नॉट अ वॅलिड पासपोर्ट” असे ओरडून त्यांना रोखले, असे थोंगडोक यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी शांघाय येथील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला. दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची सुटका झाली आणि त्या पुढील प्रवासाला निघू शकल्या.
थोंगडोक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून या घटनेला ‘भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांचा थेट अपमान’ म्हटले आहे.
त्यांनी केंद्र सरकारकडे चीनसमोर हा मुद्दा उपस्थित करण्याची, संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच, भविष्यात अरुणाचल प्रदेशमधील भारतीय नागरिकांना परदेश प्रवासादरम्यान अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची हमी देण्याची मागणीही केली आहे.
हे देखील वाचा – Dhananjay Munde : ‘माझ्या एका सहकाऱ्याची उणीव जाणवते’; परळीच्या सभेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण









