बंगळुरू- आयपीएल 2025 मधील विजयानंतर बंगळुरूमध्ये आरसीबीने (RCB)आयोजित केलेल्या विजयोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीला क्रिकेटपटू विराट कोहली (virat Kohli) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघच जबाबदार असल्याचा अहवाल कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता, तर 50 हून अधिक जण जखमी झाले होते. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे.
कर्नाटक सरकारने तो गोपनीय ठेवण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र, गोपनीयतेचा कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे सांगत न्यायालयाने ती विनंती फेटाळली. कर्नाटक सरकारने अहवालात म्हटले आहे की, आरसीबीने 3 जून रोजी पोलिसांशी संपर्क साधला होता. याच दिवशी आरसीबीने 18 वर्षांत पहिल्यांदाच आयपीएल जिंकली होती. विजय रॅली आयोजित करण्याबाबत त्यांनी पोलिसांना फक्त माहिती दिली होती. मात्र कायद्याने आवश्यक असलेल्या अधिकृत परवानगीसाठी ठरावीक मसुद्यात कोणताही अर्ज सादर केला नव्हता. कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक असतानाही आरसीबीने नियम पाळले नाहीत. त्यामुळे क्युबन पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाने 3 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारली असतानाही आरसीबीने दुसऱ्याच दिवशी सकाळी 7.01 वाजता त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर मोफत प्रवेशासह विजय रॅलीची घोषणा केली. विधानसभेपासून चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत ही रॅली निघणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर 4 जून रोजी सकाळी 8 वाजता विराट कोहलीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यात ‘हा विजय शहरवासीयांसोबत साजरा करायचा आहे’ असे कोहलीने म्हटले होते. यानंतर 4 जूनला दुपारी 3.14 वाजता पुन्हा एक पोस्ट करून रॅलीची वेळ सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत असल्याचे जाहीर करण्यात आले. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम होईल, असेही सांगण्यात आले. इतकेच नाही तर या पोस्टमध्ये पहिल्यांदाच आणि एकदाच shop.royalchallengers.com वर मोफत पास (मर्यादित प्रवेश) उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
