Bharat Bandh February 12 : केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी उद्या, १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारण्यात आला आहे. १० केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाने पुकारलेल्या या ‘भारत बंद’मध्ये सुमारे 30 कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या संपाची तयारी पूर्ण झाली असून, देशभरातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जुलाई २०२५ पेक्षा मोठा प्रतिसाद मिळण्याचा दावा
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (AITUC) सरचिटणीस अमरजित कौर यांनी सांगितले की, हा संप मागील जुलै 2025 मधील आंदोलनापेक्षाही मोठ्या स्तरावर असेल. मागील वेळी 25 कोटी लोक सहभागी झाले होते, तर यावेळी 600 जिल्ह्यांपर्यंत हा संप पोहोचण्याची शक्यता आहे. ओडिशाहून आसामपर्यंत अनेक राज्यांत ‘कडकडीत बंद’ पाळला जाईल, असा विश्वास कामगार नेत्यांनी व्यक्त केला आहे.
प्रमुख मागण्या काय आहेत?
कामगार संघटनांनी केंद्र सरकारसमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत:
- कामगार कायदे: चार नवीन कामगार संहिता आणि संबंधित नियम रद्द करावेत.
- शेतीविषयक कायदे: प्रस्तावित बियाणे विधेयक आणि वीज सुधारणा विधेयक मागे घ्यावे.
- रोजगार हमी: मनरेगा (MGNREGA) योजना पुन्हा पूर्वीप्रमाणे कार्यान्वित करावी आणि ‘विकसित भारत रोजगार अभियान 2025’ रद्द करावे.
- खाजगीकरण: सार्वजनिक उपक्रमांच्या खाजगीकरणाला आणि कंत्राटी पद्धतीला विरोध.
शेतकऱ्यांचा सक्रिय पाठिंबा
संयुक्त किसान मोर्चाने या संपाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरणार असून त्यांनी दिल्लीकडे कूच करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेसह इतर देशांतील सफरचंदांवरील आयात शुल्क कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी नेत्यांनी व्यक्त केली आहे.
जनजीवनावर काय परिणाम होणार?
संघटनांनी सरकारी विभाग, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये संपाच्या नोटिसा आधीच दिल्या आहेत. विद्यार्थी आणि युवक संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यामुळे बँकिंग सेवा, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशभरातील महत्त्वाच्या बाजारपेठा आणि औद्योगिक पट्ट्यांमध्ये उद्या तणावपूर्ण शांतता राहण्याची शक्यता असून, पोलीस प्रशासनानेही खबरदारीचे उपाय योजले आहेत.










