Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडच्या बिलासपूर रेल्वे विभागात आज दुपारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात लालखदान परिसरात झाला असून दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
हावडा मार्गावर धावणाऱ्या प्रवासी मेमू गाडीचा एक डबा समोरून येणाऱ्या मालगाडीला जोरदार धडकला. या जोरदार धडकेत मेमू गाडीचे अनेक डबे रुळावरून खाली घसरले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ माजला होता. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी अनेक प्रवाशांना डब्यांतून बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. बिलासपूरमधील सरकारी आणि खासगी रुग्णालयांत विशेष वॉर्ड देखील तयार करण्यात आले आहेत.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले की, अपघातग्रस्तांना सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींना पर्यायी मार्गावर वळवण्यात आले आहे.
प्राथमिक तपासानुसार सिग्नल फेल्युअर किंवा मानवी चुकीमुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. सविस्तर तपासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
हे देखील वाचा – Ashish Qureshi : शेलारांना आशिष कुरेशी म्हणावे उबाठा नेते अखिल चित्रेंची टीका









