Kashmir blast :दिल्ली मेट्रो स्टेशन परिसरात स्फोट करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेताना एनआयने जप्त केलेल्या स्फोटक ज्वलनशील अमोनिया नायट्रेटचा श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्याच्या आवारातच काल रात्री भयंकर स्फोट (Kashmir blast) झाला. या स्फोटात पोलीस, तपास अधिकारी यांच्यासह नऊ जण जागीच ठार झाले. स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूचे नागरिक मिळून 32 जण जखमी झाले. नऊ मृतांमध्ये राज्य पोलिसांचे दोन तपास अधिकारी, फोरेन्सिक पथकातील तीन अधिकारी, महसूल खात्याचे दोन अधिकारी, दोन फोटोग्राफर आणि तपास पथकासोबत काम करणाऱ्या एका शिंप्याचा समावेश आहे. या घटनेनंतर एवढी संवेदनशील स्फोटके पोलीस ठाण्याच्या आवारात का ठेवण्यात आली होती आणि ती हाताळताना योग्य काळजी का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा प्रकारची दुर्घटना प्रथमच झाली आहे.
जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक नलीन प्रभात यांनी याबाबत सकाळीच पत्रकार परिषद घेऊन या घटनेची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील फरिदाबाद आणि अन्य राज्यांमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा आणि रसायनांचा साठा श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला होता. नौगाम पोलीस ठाण्याबाहेरील मोकळ्या जागेत स्फोटकांचा साठा सुरक्षितपणे ठेवण्यात आला होता. जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने तपासणीसाठी फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवणे आवश्यक असते. त्यानुसार नमुने घेण्याचे काम गेले दोन दिवस सुरू होते. स्फोटकांची अत्यंत काळजीपूर्वक हाताळणी केली जात होती. मात्र तरीही काल रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी स्फोटकांचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 27 पोलीस कर्मचारी, महसूल खात्याचे 2 अधिकारी आणि 3 स्थानिक रहिवासी जखमी आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटामध्ये नौगाम पोलीस ठाण्याची इमारत उद्ध्वस्त झाली. आसपासच्या इमारतींचीही पडझड झाली आहे. स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती की, पोलीस स्थानकाभोवतालच्या सुमारे पाच किलोमीटर परिघात स्फोटाचा आवाज ऐकू आला. हा स्फोट म्हणजे निव्वळ अपघात आहे. त्यामागे कोणाचेही कसलेही षड्यंत्र नाही. मात्र, स्फोटकांची हाताळणी अत्यंत काळजीपूर्वक केली जात असतानाही स्फोट कसा झाला, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नलीन प्रभात यांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या वतीने या घटनेची माहिती दिली. ही घटना एक अपघात असून त्यामागे कसलेही षड्यंत्र नाही, असे त्यांनीही सांगितले.दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ही दुर्घटना अतिशय दुःखद आणि चिंताजनक आहे. या देशात नेमके काय चालले आहे? सरकार, सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग आणि गृह विभाग काय करत आहेत?
राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत एवढी मोठी गफलत कशी आणि कुणी केली? देशांतर्गत सुरक्षा हे सरकारचे कर्तव्य आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून सरकारने उत्तर द्यायला हवे.दिल्ली एनसीआर, हरियाणातील फरिदाबाद आणि अन्य राज्यांमधून जप्त करण्यात आलेली स्फोटके काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात का पाठवण्यात आली होती, असा प्रश्न या भीषण स्फोटानंतर विचारला जात आहे.
हे देखील वाचा –
चिराग पासवान यांनी घेतली नितीश कुमार यांची भेट; बिहारला लागले मुख्यमंत्री पदाचे वेध?









