कुल्लू – हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा, केरळ आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये जोरदार पावसामुळे (Heavy rain)पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढगफुटी, पुराचे पाणी, वाहतूक कोंडी आणि मृत्यूच्या घटना घडल्याने प्रशासन सतर्क झाले.
हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh)येथील शिमल्यातील कुल्लु आणि धर्मशाला (Dharamshala) येथे ढगफुटीने पाच जणांचा मृत्यू झाला. तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. हिमाचल प्रदेशातील चंबा, कांगडा, कुल्लू, उना, हमीरपूर, बिलासपूर, सोलन, शिमला, सिरमौर आणि मंडी जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. रैला बिहाल भागात सर्वाधिक नुकसान झाले, जिथे ढगफुटीमुळे ४ घरांचे नुकसान झाले आणि ३ लोक वाहून गेले. कुल्लूमध्ये सुमारे २००० पर्यटक अडकले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी सांगितले की, राज्यात तीन ठिकाणी ढगफुटी आणि नऊ ठिकाणी अचानक पूर आला आहे.यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कुल्लूमध्ये दोन जण बेपत्ता आहेत.
जम्मू-काश्मीरच्या (Jammu & Kashmir)डोडा जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. डोडा महामार्गावर अनेक वाहने अडकली. जम्मू विभागात मुसळधार पाऊस पडला. गेल्या २४ तासांत कटरा येथे १०८.५ मिमी, उधमपूर येथे ७१.४ मिमी, रामबन येथे ४७.५ मिमी, राजौरी येथे ८० मिमी आणि पूंछ येथे ४८ मिमी पावसाची नोंद झाली.
हरियाणात (Haryana)११ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे सोमनदी, सरस्वती, मार्कंडा, पथराळा नदीसह अनेक नद्या पूर आला. सोम नदीचा प्रवाह २८००० क्युसेकवर पोहोचला. यामुळे २० हून अधिक गावांमध्ये पुराचा धोका वाढला. कुरुक्षेत्रात ४८ तासांत ११६.३३ मिमी पाऊस पडला आहे. सरस्वती नदीच्या काठावर बांधलेल्या सरस्वती आजत आश्रमात पाणी शिरल्याने भाविक अनेक तास आश्रमात अडकले.
केरळमध्ये (Kerala)एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांतील सखल भाग पावसामुळे जलमय झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळली. तिरुअनंतपुरमसह काही ठिकाणी सामान्य जनजीवन विस्कळीत झाले . आयएमडीने इडुक्की, मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला. एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवट्टुपुझा नदी, त्रिशूर आणि मलप्पुरममधून वाहणाऱ्या भरतपुझा, पथनमथिट्टामधील अचनकोविल आणि पंबा नद्या, कोट्टायममधील मनिमाला, इडुक्कीमधील थोदुपुझा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.
गुजरातच्या (Gujarat)अहमदाबादमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. मणिनगर, वाटवा, सिटीएम, हटकेश्वर, निकोल ओढव आणि विराटनगरसह अनेक पूर्वेकडील भाग पाण्याखाली गेले. पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ड्रेनेजमध्ये पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अग्निशमन विभागाने नऊ तासांच्या मोहिमेनंतर तो बाहेर काढला. सुरतमध्येही सलग तीन दिवसांपासून पूरसदृश परिस्थितीआहे. बडोद्यामध्ये, मुसळधार पावसामुळे अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जंबुबा ब्रिज रोडवर मोठे खड्डे पडले. त्यामुळे १५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.