Holi 2026 : भारतीय संस्कृतीमध्ये रंगांची उधळण करणारा होळीचा सण हा अत्यंत उत्साहाचा आणि आनंदाचा मानला जातो. देशभरात कुठे गुलालाची उधळण होते, तर कुठे फुलांच्या वर्षावात होळी साजरी केली जाते. मात्र, आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये होळीचे एक असे रूप पाहायला मिळते, जे पाहून सामान्य माणूस थक्क होतो. येथील मणिकर्णिका घाटावर रंगांऐवजी चक्क ‘चितेच्या भस्माने’ (राखेने) होळी खेळली जाते, ज्याला ‘मसान होळी’ म्हणून जगभरात ओळखले जाते.

परंपरेचा अध्यात्मिक वारसा आणि शिवभक्ती-
मसान होळीची ही परंपरा केवळ एक सण नसून ती हजारो वर्षांपासून जपलेला एक प्रगल्भ वारसा आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या परंपरेचा थेट संबंध भगवान शिवशंकराशी जोडला जातो. असे मानले जाते की, रंगभरी एकादशीच्या दिवशी महादेव माता पार्वतीला गौना (पाठवणी) करून काशीत आणतात.

देव आणि मानवांसोबत होळी खेळल्यानंतर, भगवान शिव मणिकर्णिका घाटावर येतात आणि तिथे राहणाऱ्या आपल्या प्रिय गणांसोबत, पिशाच्चांसोबत आणि अघोरींसोबत चितेच्या भस्माने होळी खेळतात. त्यांच्या या अलौकिक अस्तित्वाचे प्रतीक म्हणून आजही काशीमध्ये भस्माची होळी खेळली जाते.

जीवन-मृत्यूच्या चक्राचा संदेश-
सामान्यतः स्मशानभूमीचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या मनात भीती किंवा दु:खाची भावना निर्माण होते. परंतु, वाराणसीच्या या स्मशानभूमीत भीतीवर आनंदाने विजय मिळवला जातो. ‘मसान होळी’ हा उत्सव आपल्याला जीवनाचे अंतिम सत्य असलेल्या मृत्यूची जाणीव करून देतो. जन्म आणि मृत्यू हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, मृत्यू ही शेवट नसून तो एक प्रवास आहे, असा संदेश या प्रथेमधून दिला जातो. चितेच्या गरम राखेतून निर्माण होणारा हा उत्सव मृत्यूलाही ‘मंगलमय’ ठरवतो.

भक्ती आणि चैतन्याचा संगम-
मणिकर्णिका घाटावर जेव्हा ही होळी खेळली जाते, तेव्हा संपूर्ण वातावरण ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून जाते. डमरूचा नाद, अघोरींची साधना आणि हवेत उडणारी चितेची राख एक अद्भूत वातावरण निर्माण करते. शिवभक्त मोठ्या श्रद्धेने या राखेला आपल्या अंगाला लावतात. जीवनातील नश्वरता स्वीकारून, अहंकाराचा त्याग करून ईश्वराशी एकरूप होण्याचे हे एक प्रतिक मानले जाते.

(टीप : वरील बातमीची पुष्टी आम्ही करत नाही. बातमी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. )










