India US Trade Deal: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्यापार करारावरून मोठी चर्चा सुरू असतानाच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेने भारतावर लादलेले प्रचंड शुल्क आणि सततची टीका या पार्श्वभूमीवर, भारताने ट्रम्प प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की, जर अमेरिकेच्या अटी मान्य नसतील तर भारत हा करार करण्यासाठी ट्रम्प यांची टर्म संपेपर्यंत वाट पाहण्यास तयार आहे.
अजित डोवाल यांची ‘डेरिंग’ भूमिका
रिपोर्टनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्यात एक अत्यंत गुप्त बैठक झाली. या बैठकीत डोवाल यांनी अमेरिकेची अरेरावी खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
त्यांनी रुबिओ यांना सांगितले की, “भारत कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. यापूर्वीही भारताने अमेरिकेची प्रतिकूल प्रशासने पाहिली आहेत, त्यामुळे गरज पडल्यास आम्ही पुढच्या चार वर्षांसाठी या कराराची वाट पाहू.”
वादाचे नेमके कारण काय?
ट्रम्प प्रशासनाने भारतीय निर्यातीवर 50 टक्के इतके भरमसाठ शुल्क लादले होते. तसेच रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून भारतावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. मे 2025 मधील भारत-पाकिस्तान संघर्षात ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा खोटा दावा केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते.
विशेषतः शेती आणि दुग्धव्यवसाय या क्षेत्रांत अमेरिकेला झुकते माप देण्यास भारताने आधीच ‘रेड लाईन’ आखली आहे.
ट्रम्प यांची घाई आणि भारताचे मौन
दुसरीकडे, अमेरिकेत होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर हा व्यापार करार पूर्ण झाल्याची घोषणा करून टाकली. मात्र, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी संवाद झाल्याचे मान्य केले असले तरी व्यापार करारावर अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. कराराचा तपशील अद्याप समोर आलेला नसल्याने भारतातील विरोधकांनीही सरकारवर टीका सुरू केली आहे.
काय असेल भारताची रणनीती?
अजित डोवाल यांनी मांडलेली भूमिका पाहता, मोदी सरकार देशाच्या हिताचा कोणताही सौदा अमेरिकेच्या दबावाखाली करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. भारताने अमेरिकेला सार्वजनिकरीत्या टीका थांबवण्यास सांगितले असून संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी हा करार भारताच्या अटींवर होणे आवश्यक असल्याचे कळवले आहे. आता 2029 पर्यंत वाट पाहायची की ट्रम्प प्रशासनाला नमवायचे, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.









