Indian Railways Fare Hike | भारतीय रेल्वेने अनेक वर्षांनंतर प्रथमच प्रवासी भाड्यात किरकोळ वाढ (Indian Railways Fare Hike) जाहीर केली आहे. 1 जुलै 2025 पासून नवीन तिकीट दरवाढ लागू होईल. यासोबतच, तत्काळ तिकीट बुकिंगच्या (Tatkal Ticket Booking) नियमांतही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, आधार ऑथेंटिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. या बदलांमुळे प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
रिपोर्टनुसार, नॉन-एसी मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्यात 1 पैसा प्रति किलोमीटर, तर एसी क्लाससाठी 2 पैसे प्रति किलोमीटरने वाढ होईल.
प्रमुख बदल खालीलप्रमाणे:
उपनगरीय रेल्वे आणि द्वितीय श्रेणी: उपनगरीय रेल्वे आणि 500 किलोमीटरपर्यंतच्या द्वितीय श्रेणी प्रवासाच्या भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही.
500 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर: या प्रवासासाठी भाडेवाढ अर्धा पैसा प्रति किलोमीटर असेल.
मासिक पास: मासिक पासच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही, ज्यामुळे नियमित प्रवाशांना दिलासा मिळेल.
तत्काळ बुकिंगचे नवे नियम
1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य असेल. रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी सर्व रेल्वे झोनला याबाबत निर्देश दिले. या बदलाचा उद्देश तत्काळ योजनेचा लाभ सामान्य प्रवाशांना मिळावा, हे सुनिश्चित करणे आहे. रेल्वेच्या सूचनेनुसार, “IRCTC च्या वेबसाइट/ॲपद्वारे तत्काळ तिकिटे केवळ आधार-प्रमाणित वापरकर्त्यांनाच बुक करता येतील.”
आधार-आधारित ओटीपी आणि एजंटवरील निर्बंध
15 जुलैपासून ओटीपी: तत्काळ तिकिटे बुक करताना आधार-आधारित ओटीपी ऑथेंटिकेशनचा उपयोग केला जाईल. अतिरिक्त पायरी पूर्ण करावी लागेल. अधिकृत बुकिंग एजंटना पहिल्या अर्ध्या तासाच्या विंडोमध्ये (एसीसाठी सकाळी 10:00-10:30 आणि नॉन-एसीसाठी 11:00-11:30) तत्काळ तिकिटे बुक करण्यास मनाई आहे.
रेल्वे मंत्रालयाने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) आणि IRCTC ला आवश्यक तांत्रिक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. या बदलांची माहिती सर्व विभागीय रेल्वे झोनपर्यंत पोहोचवली जाईल. या उपाययोजनांमुळे तत्काळ बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.