Railway Tatkal Tickets | भारतीय रेल्वेने (Indian Railways) तत्काळ तिकीट (Tatkal tickets) बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत, सर्व IRCTCखात्यांसाठी आधार व्हेरिफिकेशन (Aadhaar verification) अनिवार्य केले आहे. आता केवळ आधार-प्रमाणित ग्राहकांनाच तत्काळ तिकीट बुक करण्याची परवानगी मिळेल.
रेल्वे मंत्रालयाने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्सला प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्याचे अधिकार दिले आहेत.
२७ मे २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या राजपत्र अधिसूचनेत म्हटले आहे की, आता तत्काळ तिकीट बुकिंग करताना OTP आधारित प्रमाणीकरण आवश्यक असेल. यामध्ये ‘हो/नाही’ प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी (eKYC) चा वापर केला जाणार आहे. हे फक्त ऑनलाइन तत्काळ बुकिंगपुरते मर्यादित नसून, काउंटर बुकिंगवरहीलागू होणार आहे.
सध्या IRCTC कडे 130 दशलक्षांहून अधिक सक्रिय ग्राहक आहेत, परंतु यापैकी केवळ 12 दशलक्ष ग्राहक आधार-व्हेरिफाइड आहेत. त्यामुळे, नोंदणीकृत परंतु आधार नसलेल्या सर्व खात्यांसाठी विशेष पडताळणी मोहीम राबवली जाणार आहे. संशयास्पद खाती बंद केली जातील. यामुळे तत्काळ बुकिंग अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होईल.
रेल्वे मंत्रालयाच्या मते, आधार जोडलेली खाती तत्काळ तिकीट खरेदीच्या पहिल्या 10 मिनिटांत प्राधान्याने बुक करू शकतील. अधिकृत IRCTC एजंट्सलाही हे प्राधान्य दिले जाणार नाही.
डिजिटल सुधारणा आणि तांत्रिक पावले
भारतीय रेल्वेने तत्काळ बुकिंगमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी डिजिटल प्रणालींचे आधुनिकीकरण केले आहे. यामध्ये अँटी-बॉट सिस्टम आणि सीडीएन यांचा समावेश आहे. हे उपाय बॉट ट्रॅफिक थांबवण्यास मदत करत असून, तत्काळ बुकिंगच्या पहिल्या 5 मिनिटांत होणाऱ्या 50% बॉट लॉगिन्समध्ये लक्षणीय घट झाली आहे.
दरम्यान, 22 मे 2025 रोजी भारतीय रेल्वेने एका मिनिटात 31,814 तिकिटे बुक करून नवीन विक्रम प्रस्थापित केला. तसेच, सुमारे 2.5 कोटी संशयास्पद युझर ID निष्क्रिय करण्यात आले आहेत.